11-09-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, या अंतिम जन्मामध्ये गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमलपुष्प समान पवित्र बना, एका बाबांची आठवण करा, हीच गुप्त मेहनत आहे”

प्रश्न:-
ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळताच कोणता कॉन्ट्रास्ट (विरोधाभास) स्पष्ट अनुभव होतो?

उत्तर:-
१) भक्तीमध्ये भगवंताला प्राप्त करण्यासाठी किती दारोदार भटकत होतो, किती खस्ता खात होतो. आता आम्हाला तो मिळाला. २) त्याबरोबरच दया येते की बिचारे मनुष्य अजूनपर्यंत भटकत आहेत, मार्ग शोधत आहेत. बाबांनी आम्हाला भटकण्यापासून सोडवले. आम्ही बाबांबरोबर जाण्याची तयारी करत आहोत.

गीत:-
आज अन्धेरे में हैं इंसान…

ओम शांती।
एकीकडे भक्त आठवण करत आहेत. दुसरीकडे आत्म्यांना तिसरा नेत्र मिळालेला आहे अर्थात आत्म्यांना बाबांची ओळख मिळालेली आहे. ते (दुनियावाले) म्हणतात - आम्ही भटकत आहोत. आता तुम्ही काही भटकत नाही. किती फरक आहे. बाबा तुम्हा मुलांना सोबत घेऊन जाण्यासाठी तयार करत आहेत. मनुष्य गुरूंच्या मागे, तीर्थयात्रा, उत्सव-जत्रा इत्यादींच्या मागे किती भटकत आहेत. तुमचे भटकणे आता सुटले आहे. मुले जाणतात, या भटकण्यापासून सोडविण्याकरिता बाबा आलेले आहेत. जसे कल्पापूर्वी बाबांनी येऊन शिकवले होते अथवा राजयोग शिकवला होता, हुबेहूब अगदी तसेच शिकवत आहेत. मुले जाणतात आम्ही ५ विकारांवर विजय प्राप्त करत आहोत. म्हटले जाते - ‘माया जीते जगत जीत’. माया, ५ विकाररुपी रावणाला म्हटले जाते. माया शत्रू आहे. माया काही धन-संपत्तीला म्हटले जात नाही. लिहायचे देखील आहे - ५ विकाररुपी रावण अथवा माया...’ तेव्हा कुठे मनुष्य थोडा अर्थ समजतील, नाहीतर समजू शकणार नाहीत. माया जीते जगत जीत. यामध्ये यादव आणि कौरव अथवा असुर आणि देवतांबद्दल काही गोष्ट नाही. स्थूल युद्ध होत नाही. गायले जाते - योगबलाने माया रावणावर विजय प्राप्त केल्याने जगत जीत बनतात. तुम्ही मुले जाणता - ‘जगत’ म्हटले जाते - विश्वाला. विश्वावर विजय मिळवून देण्यासाठी विश्वाचे मालकच येतात. तेच सर्वशक्तिमान आहेत. हे तर मुलांना समजावून सांगितले गेले आहे - बाबांची आठवण केल्यामुळेच पापे भस्म होतात. मुख्य गोष्ट आठवण करण्याची आहे. आठवण केल्यामुळे तुमच्याकडून कोणतेही विकर्म होणार नाही आणि आनंदात राहाल. पतित-पावन बाबा पावन बनविण्याकरिता आले आहेत, तर मग आपण विकर्म का करावी! स्वतःला सांभाळायचे आहे. मनुष्याला बुद्धी तर आहे ना. यामध्ये काही युद्ध करणे इत्यादीची गोष्ट नाहीये, फक्त ५ विकारांना जिंकण्यासाठी बाबांची आठवण करणे सोपे आहे. हो, यामध्ये मेहनत करावी लागते, वेळ लागतो. माया दिवा विझवण्यासाठी वारंवार वादळे आणते. बाकी यामध्ये युद्धाची काही गोष्ट नाहीये. तिथे आहेच देवतांचे राज्य. असुर कोणी असत नाहीत.

आम्ही आहोत - ब्रह्मा मुखवंशावली ब्राह्मण. जे ब्राह्मण कुळाचे आहेत तेच स्वतःला ब्राह्मण समजतात. रूहानी बाबा आम्हा आत्म्यांना बसून ज्ञान देत आहेत. ज्ञानसागर, पतित-पावन, सद्गती दाता एकच आहेत. तेच स्वर्ग स्थापन करणारे आहेत. तुम्हा मुलांना तर खूप आनंद झाला पाहिजे. परदेशी लोकांना देखील माहीत होईल, हे तर तेच सिंधवाले ब्रह्माकुमार-कुमारी आहेत जे म्हणतात - श्रीमतावर स्वर्ग स्थापन करून दाखवू. आत्मा शरीरा द्वारे म्हणते ना. आत्मा ऐकते आणि डायरेक्शन प्रमाणे चालते. कल्प-कल्प बाबाच येऊन युक्ती सांगतात. बाबा आहेत गुप्त. कोणालाही कळून येत नाही. किती असंख्या लोकांना हे ज्ञान समजावून सांगतात, तरी देखील कोटींमध्ये कोणीच समजतात. तुम्ही मुले आता समजता, आमचा ऑलराऊंड पार्ट आहे. बाबांनी सांगितले आहे राज्य तुम्हीच मिळवता; जे आता स्वतःला हिंदू म्हणवता, त्या तुम्हा भारतवासीयांव्यतिरिक्त इतर कोणीही राज्य घेऊ शकत नाही. जनगणनेमध्ये आम्ही भले काहीही नाव दिले तरी देखील ‘हिंदू’ धर्मच लिहितात. आपण खरेतर आदि सनातन देवी-देवता धर्माचे होतो. ते आता दैवी धर्म भ्रष्ट, कर्म भ्रष्ट झाल्यामुळे स्वतःला हिंदू म्हणतात. हिंदू नाव का पडले - हे देखील कोणी जाणत नाही. विचारले पाहिजे - भले हे तर सांगा की, तुमचा हिंदू धर्म कोणी स्थापन केला! ‘हिंदू’, हे तर हिंदुस्थानचे नाव आहे. परंतु कोणीही सांगू शकणार नाही. तुम्ही मुले जाणता आता ब्राह्मण, देवता, क्षत्रिय धर्माची स्थापना होत आहे. म्हणतात - ब्राह्मण देवी-देवताय नमः. ब्राह्मण आहेत - सर्वोत्तम नंबरवन ब्राह्मण. वास्तविक स्वर्ग सतयुगाला म्हटले जाते. रामचंद्राच्या राज्याला देखील स्वर्ग म्हटले जात नाही. अर्धा कल्प रामराज्य आहे, अर्धा कल्प आसुरी राज्य आहे. हे सर्व अंत:करणात धारण करायचे आहे. आता आम्हाला स्वर्गामध्ये जाण्यासाठी काय करायचे आहे? पवित्र तर जरूर रहायचेच आहे. बाबा म्हणतात - मुलांनो, काम विकार महाशत्रू आहे, याच्यावर विजय प्राप्त करून पवित्र राहायचे आहे; म्हणून कमळ फुलाचे चिन्ह देखील दाखवले आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना कमलपुष्प समान बनायचे आहे. हा दृष्टांत तुमच्यासाठी आहे. हठयोगी तर गृहस्थ व्यवहारामध्ये कमलपुष्प समान राहू शकणार नाहीत. ते आपला निवृत्ती मार्गाचा पार्ट बजावतात. गृहस्थ व्यवहारामध्ये राहू शकत नाहीत, म्हणून घरदार सोडून निघून जातात. तुम्ही दोन्ही संन्यासांची तुलना करू शकता. प्रवृत्ती मार्गामध्ये राहणाऱ्यांचे गायन आहे. बाबा म्हणतात - गृहस्थ व्यवहारामध्ये राहून फक्त हा एक शेवटचा जन्म हिंमत करून कमलपुष्प समान पवित्र रहा. भले आपल्या गृहस्थ व्यवहारामध्ये रहा. ते संन्यासी तर घरदार सोडून जातात. भरपूर संन्यासी आहेत ज्यांना भोजन द्यावे लागते. आधी ते देखील सतोप्रधान होते आता तमोप्रधान बनले आहेत. हा देखील त्यांचा ड्रामामध्ये पार्ट आहे. तरी देखील पुन्हा असेच घडेल.

बाबा म्हणतात - या पतित दुनियेचा विनाश तर होणारच आहे. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये देखील एकमेकांना धमकी देत रहातात. जर अमूक गोष्ट झाली नाही तर मोठे युद्ध होईल. तुम्ही मुले समजता कल्पापूर्वी देखील असे झाले होते. शास्त्रांमध्ये लिहिले आहे - ‘पोटातून मुसळे निघाली, असे झाले…’ मग होळीमध्ये सोंग बनवतात. प्रत्यक्षात ही मिसाइल्स आहेत, ज्याच्याद्वारे विनाश करतात. हे देखील मुले जाणतात, जे काही घडून गेले आहे ते आता देखील पुन्हा होणार आहे. ‘बनी बनाई बन रही…’ आता तुमच्या बुद्धीमध्ये सर्व रहस्ये आहेत. फक्त बोलण्याची गोष्ट नाहीये. कोणालाही दोष देऊ शकत नाही. ड्रामामध्ये पार्ट आहे. तुम्हाला फक्त बाबांचा संदेश ऐकवायचा आहे. हा ड्रामा तर अनादि अविनाशी आहे. भावी काय गोष्ट आहे, हे देखील तुम्ही समजला आहात. हा कलियुगाचा अंत आणि सतयुगाचा आदि यांचा संगम प्रसिद्ध आहे. यालाच पुरुषोत्तम युग म्हटले जाते. आजकाल बाबा, मुलांना पुरुषोत्तम युगावर खूप काही सांगत आहेत. हे उत्तम पुरुष बनण्याचे युग आहे. सर्वजण सतोप्रधान उत्तम बनाल. आता आहात - तमोप्रधान, कनिष्ठ. या शब्दांना देखील तुम्ही समजता. कलियुग पूर्ण होऊन सतयुग येईल आणि मग जयजयकार होईल. कहाणी सांगितली जाते ना. हे सोप्यात सोपे आहे. खोट्या कहाण्या तर खूप आहेत. आता बाबा स्वतः बसून समजावून सांगत आहेत, भक्तिमार्गामध्ये तुम्ही माझी महिमा गात आला आहात. आता प्रत्यक्षात तुम्हाला सुखधाम आणि शांतीधामचा मार्ग दाखवतो. सद्गतीला सुख-गती, दुर्गतीला दुःख-गती म्हणणार. कलियुगामध्ये आहे - दुःख, सतयुगामध्ये आहे - सुख. समजावून सांगितल्यावर सर्व समजतील. पुढे गेल्यावर समजत जातील. वेळ खूप कमी आहे, लक्ष्य खूप उच्च आहे. कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही जर समजावून सांगाल तर हे नॉलेज चांगल्या प्रकारे समजतील. खरोखर हे ड्रामाचे चक्र फिरत राहते, दुसरी कोणती दुनिया नाहीये. ते (दुनियावाले) समजतात की, वरती कोणती दुनिया आहे, म्हणून ग्रह-तारे इत्यादी ठिकाणी जातात. वास्तविक तिथे काहीच नाहीये. गॉड इज वन, क्रिएशन इज वन. मनुष्य सृष्टी हीच आहे. मनुष्य, मनुष्यच आहेत, फक्त देहाचे अनेक धर्म आहेत. किती व्हरायटी (प्रकार) आहेत. सतयुगामध्ये देखील एकच धर्म होता, त्याला सुखधाम म्हटले जाते. कलियुग आहे दुःख धाम. सुख आणि दुःखाचा खेळ आहे ना. बाबा थोडेच मुलांना कधी दुःख देतील? बाबा तर येऊन दुःखातून लिबरेट करतात. जे दुःख हर्ता आहेत ते काही कोणाला दुःख थोडेच देतील. आता रावण राज्य आहे. मनुष्यांमध्ये ५ विकार आहेत म्हणून रावण राज्य म्हटले जाते. जगाच्या इतिहास-भूगोलाचे रहस्य देखील आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आले आहे. रोज ऐकता, हे खूप श्रेष्ठ शिक्षण आहे. तर बाबा समजावून सांगत आहेत - आता वेळ फार थोडा शिल्लक आहे. एवढ्या वेळामध्ये बाबांकडून पूर्ण वारसा घ्यायचा आहे. हळूहळू मनुष्य देखील समजतील खरोखर, ईश्वर प्राप्तीचा मार्ग तर हेच सांगत आहेत. दुनियेमध्ये इतर कोणीही ईश्वराला प्राप्त करण्याचा मार्ग सांगत नाहीत. ईश्वराचा मार्ग ईश्वरच सांगतात. तुम्ही तर त्यांची मुले संदेश देणारे आहात. कल्पापूर्वी देखील जे निमित्त बनले असतील तेच आता बनतील आणि बनवत जातील. मुलांना विचार सागर मंथन करायचे आहे. आपला विचार मांडला पाहिजे - ‘बाबा, आम्हांला असे वाटते की, ही चित्रे असायला हवीत, यावरून माणसे चांगले समजू शकतील. बाबा, कमी चित्रे असावीत असे एवढ्यासाठी सांगतात कारण बरीच सेंटर्स अगदी छोटी-छोटी आहेत. ५-७ चित्रे देखील फार मुश्किलीने ठेवू शकतात. बाबा म्हणतात घरा-घरामध्ये गीता पाठशाळा असावी. असे देखील खूप आहेत एका खोलीमध्ये सर्व काही चालवत आहेत. मुख्य चित्रे ठेवलेली असतील तर लोकांना कळेल. शेवटी भगवान कोणाला म्हटले जाते, त्यांच्याकडून काय मिळते? भगवंताला, ‘बाबा’ म्हटले जाते. ‘बबुलनाथ बाबा’ असे म्हटले जात नाही. ‘रुद्र बाबा’ असेही म्हटले जात नाही. ‘शिव बाबा’ प्रसिद्ध आहेत. बाबा म्हणतात - हा तोच कल्पापूर्वीचा ज्ञान-यज्ञ आहे. बेहदचे बाबा ‘शिव’ यांनी हा यज्ञ रचला आहे. ब्राह्मणांची रचना आहेच मुळी ब्रह्मा द्वारे. ब्रह्मामध्ये प्रवेश करून स्थापना केली आहे. हे आहे राजयोगाचे ज्ञान. आणि मग यज्ञ देखील आहे, ज्यामध्ये सर्व जुन्या दुनियेची आहुती पडते. एक तेच पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत, गुरु देखील आहेत, ज्ञान-सागर देखील आहेत. असा दुसरा कोणीही नाही. आजकाल यज्ञ करतात तेव्हा चारही बाजूंनी शास्त्रे ठेवतात. आहुतीचे एक कुंड देखील बनवतात. वास्तविक आहे - हा ज्ञान-यज्ञ, ज्याची त्यांनी नक्कल केली आहे. इथे कोणती स्थूल वस्तू इत्यादी तर नाहीये. आता तुम्हा मुलांना बेहदचे बाबा मिळाले आहेत, बेहदचे ज्ञान मिळाले आहे; इतर कोणीही हे जाणत नाहीत. बेहदची आहुती पडणार आहे, हे तुम्हीच जाणता. जुनी दुनिया नष्ट होईल. त्यामुळे तर आनंद होत राहतो की रामराज्य स्थापन होईल, हे तर खूप चांगले आहे; परंतु जे ते राज्य स्थापन करतील ते स्वतःसाठीच करतील ना. सर्वजण मेहनत स्वतःसाठी करतील. तुम्ही जाणता हे महाभारत युद्ध देखील या यज्ञातून प्रज्वलित झाले आहे. कुठे त्या हदच्या गोष्टी, कुठे या बेहदच्या गोष्टी. तुम्ही स्वतःसाठीच पुरुषार्थ करता. जोपर्यंत बाबांना जाणत नाही, वारसा मिळू शकत नाही. बाबाच येऊन आत्म्यांना शिकवण देतात. तुमचे सर्वच आता गुप्त आहे. आत्मा जी हिंसक बनली आहे, तिला अहिंसक बनवायचे आहे. कोणावरही चिडायचे सुद्धा नाही. ५ विकार जेव्हा दान कराल तेव्हा ग्रहण सुटेल, याच्यामुळेच काळे बनला आहात. आता पुन्हा सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण कसे बनावे ते आता बाबा बसून समजावून सांगत आहेत. या लक्ष्मी-नारायणाला असे कोणी बनवले? कोणी गुरु मिळाला का? हे तर विश्वाचे मालक होते. नक्की पूर्वजन्मामध्ये चांगली कर्म केली आहेत तेव्हाच तर चांगला जन्म मिळाला आहे. चांगल्या कर्मांमुळे चांगला जन्म मिळतो. ब्रह्मा आणि विष्णूचा परस्पर संबंध देखील जरूर आहे. ब्रह्मा सो विष्णू एका सेकंदामध्ये बनतात. मनुष्यापासून देवता बनतात, सेकंदामध्ये जीवनमुक्ती तर यालाच म्हटले जाते. बाबांचे बनले आणि जीवनमुक्तीचा वारसा मिळवला. जीवनमुक्त तर राजा, प्रजा सर्व आहेत. जे पण येणार आहेत त्यांना जीवनमुक्त बनायचेच आहे. बाबा तर सर्वांना समजावून सांगतात. परंतु मग श्रेष्ठ पद प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. सर्व काही पुरुषार्थावर अवलंबून आहे. का बरे पुरुषार्थ करता-करता श्रेष्ठ पद प्राप्त करायचे नाही! बाबांची खूप आठवण कराल तर बाबांच्या हृदयावर अर्थात सिंहासनावर चढाल. बाबा काही कष्ट देत नाहीत. अबलांकडून आणखी काय मेहनत करून घ्यायची? बाबांची आठवण देखील गुप्त आहे. ज्ञान तर प्रत्यक्ष होते. म्हटले जाते यांचे भाषण तर खूप चांगले आहे, परंतु योगमध्ये कितपत आहेत? बाबांची आठवण करतात का? किती वेळ आठवण करतात? आठवणीमुळेच जन्म-जन्मांतरीची विकर्म विनाश होतील. हे स्पिरिचुअल नॉलेज कल्प-कल्प रूहानी बाबाच येऊन देतात. इतर कोणीही हे ज्ञान देऊ शकत नाहीत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) अविनाशी ड्रामाच्या रहस्याला बुद्धीत ठेवून कोणालाही दोषी बनवायचे नाही. पुरुषोत्तम बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. या थोड्या वेळात बाबांकडून पूर्ण वारसा घ्यायचा आहे.

२) डबल अहिंसक बनण्यासाठी कधीही कोणावर चिडायचे नाही. विकारांचे दान देऊन सर्वगुण संपन्न बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.

वरदान:-
सेकंदामध्ये सर्व प्रकारच्या दुबळेपणापासून मुक्ती प्राप्त करून मर्यादा पुरुषोत्तम बनणारे सदा स्नेही भव

जसे, प्रेम करणारे प्रेमापोटी आपले सर्व काही ओवाळून टाकतात अथवा अर्पण करतात. प्रेम करणाऱ्याला काहीही समर्पण करण्यासाठी वेगळा विचार करावा लागत नाही. तर ज्या काही मर्यादा अथवा नियम ऐकता त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी अथवा सर्व प्रकारच्या दुबळेपणापासून मुक्ती प्राप्त करण्याची सोपी युक्ती आहे - सदैव एका बाबांचे प्रेमी बना. ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे, त्याच्या संगतीमध्ये निरंतर रहा, म्हणजे मग रूहानियतचा रंग लागेल आणि एका सेकंदामध्ये मर्यादा पुरुषोत्तम बनाल, कारण असे प्रेम करणाऱ्याला आपोआपच बाबांचा सहयोग मिळतो.

बोधवाक्य:-
निश्चयाचे फाउंडेशन मजबूत असेल तर संपूर्णतेपर्यंत पोहोचणे निश्चित आहे.

अव्यक्त इशारे - आता आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.

यावेळी सर्व आत्मे भिकाऱ्याच्या स्वरूपामध्ये भगवंताकडे काही ना काही मागत आहेत. सर्वांच्या तोंडामध्ये अथवा मनामध्ये हेच असते की हे-हे द्या. कोणी धनाचे भिकारी आहेत, कोणी सहयोगाचे, कोणी नात्याचे, कोणी थोड्या वेळासाठी सुख-शांतीचे, कोणी विश्रांतीचे अथवा झोपेचे, कोणी फॉलोअर्सचे भिकारी आहेत. तुम्ही दात्याची मुले मास्टर दाता बनून आपल्या शुभ भावनेच्या वृत्ती द्वारे भिकारी आत्म्यांची भूक भागवा.