19-08-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, तुम्हाला आता रुहानी कारभार करायचा आहे. रुह (आत्मा) समजून प्रत्येक कर्म केल्याने आत्मा निर्विकारी बनत जाते”

प्रश्न:-
स्वर्गाचा वारसा घेण्याचा आणि स्वर्गामध्ये उच्च पद प्राप्त करण्याचा आधार कोणता आहे?

उत्तर:-
ब्रह्माकुमार-कुमारी बनलात तर स्वर्गाचा वारसा मिळेल. परंतु उच्च पदाचा आधार आहे - अभ्यास. जर बाबांचे बनून नियमित शिकत राहिलात, पूर्ण पवित्र बनलात तर राजाई पद मिळते. काही जण नीट शिकत नाहीत, कर्मबंधन आहे, पूर्ण पवित्र बनले नाहीत आणि शरीर सुटले तर प्रजेमध्ये देखील साधारण पद मिळेल.

ओम शांती।
रुहानी मुलांना रुहानी बाबा समजावून सांगत आहेत. इथे रुहानी कारभार (आत्मिक कारभार) आहे. बाकी साऱ्या दुनियेमध्ये भौतिक कारभार आहे. वास्तविक कारभार चालतो आत्म्यांचा. आत्माच या शरीराद्वारे शिकते, चालते, विकर्म करते म्हणूनच पतित-आत्मा, पाप-आत्मा म्हटले जाते. आत्माच सर्व काही करते. यावेळी सर्व मनुष्य देह-अभिमानी आहेत; ‘मी आत्मा आहे’, असे समजण्याऐवजी समजतात की, ‘मी अमका आहे, हा व्यापार करतो’. हे अमके कामी, क्रोधी आहेत. शरीराचेच नाव घेतात. याला म्हटले जाते देह-अभिमानी दुनिया, उतरत्या कलेची दुनिया. सतयुगामध्ये असे होत नाही. इथे देही-अभिमानी असतात. तुम्हाला देही-अभिमानी बनवले जाते. स्वतःला आत्मा निश्चय करा. मी आत्मा हे शरीर रुपी वस्त्र धारण करून पार्ट बजावत आहे. ते ॲक्टर्स देखील विविध कपडे बदलून पार्ट बजावतात. बाबा म्हणतात - तुम्ही आत्मे अगोदर शांतीधाम मध्ये होता. तुमचे घर आहे - शांतीधाम. जसे ते हदचे नाटक असते, हे मग आहे बेहदचे नाटक. सर्व आत्मे परमधामवरून येऊन, शरीर धारण करून पार्ट बजावतात. आत्म्यांचे मूळ घर आहे - परमधाम. त्या ॲक्टर्सचे तर घर इथेच असते. ड्रेस बदलून येऊन पार्ट बजावतात. तर बाबा बसून समजावून सांगत आहेत की, तुम्ही आत्मे आहात. बाबा तर ‘बाळांनो-बाळांनो’ असेच म्हणतील. संन्यासी लोक काही ‘बाळांनो-बाळांनो’ असे म्हणणार नाहीत. बाबा म्हणतात - मी पतित-पावन, तुम्हा सर्व आत्म्यांचा पिता आहे, ज्याला तुम्ही गॉड फादर म्हणता. गॉड फादर तर निराकार आहेत. ब्रह्मा, विष्णू, शंकराला देखील गॉड फादर म्हणणार नाही. त्यांच्यामध्ये देखील आत्मा आहे, परंतु त्यांना म्हटले जाते - ‘ब्रह्मा देवताय नमः, विष्णु देवताय नमः…’ देवता काय करतात? हे कोणालाच ठाऊक नाही. बाबाच येऊन समजावून सांगतात की, तुम्ही कसे ड्रामा प्लॅन अनुसार पार्ट बजावता. दुनिया एकच आहे. असे नाही की दुनिया कुठे पाताळात अथवा वरती आहे. दुनिया एकच आहे, जिचे चक्र फिरत राहते. लोक तर म्हणतात चंद्रावर प्लॉट घेणार. बाबा समजावून सांगत आहेत - मुले किती इनसॉल्व्हेंट (अपवित्र) बनली आहेत. भारतवासीयांकरिताच म्हणतात - तुम्ही किती श्रीमंत, हुशार होता. या लक्ष्मी-नारायणाचे साऱ्या विश्वावर राज्य होते, ज्याला कोणीही लुटू शकत नाही. तिथे कोणतेही विभाजन इत्यादी नसते. इथे किती पार्टिशन आहे. आपसामध्ये तुकड्या-तुकड्यावरून भांडत राहतात. तुम्ही साऱ्या विश्वाचे मालक होता. सारे आकाश, पृथ्वी, समुद्र सर्व काही तुमचेच होते, तुम्ही त्याचे मालक होता. आता तर तुकडे झाले आहेत. हे कोणालाच ठाऊक नाहीये की, भारतच विश्वाचा मालक होता.

बाबा समजावून सांगत आहेत - आत्म्याला जो पार्ट मिळालेला आहे तो कधीही झिजत नाही. चालतच राहतो. आता तुम्ही पुन्हा मनुष्यापासून देवता बनत आहात. आणि मग ८४ जन्म घ्याल. तुमचा पार्ट चालतच राहतो, कधीही बंद होत नाही. कोणालाही मोक्ष इत्यादी प्राप्त होत नाही. जितके अनेक गुरु, अनेक शास्त्रे, तितकी अनेक मते असतात. मनुष्यांमध्ये किती अशांती आहे. जिथे पण जाल म्हणतील - ‘मनाला शांती कशी मिळेल?’ हे देह-अभिमानामध्ये येऊन म्हणतात. बाबा म्हणतात - मन आणि बुद्धी ही आत्म्याची कर्मेंद्रिये आहेत. बाकीची सर्व या शरीराची कर्मेंद्रिये आहेत. आत्मा म्हणते - ‘माझ्या मनाला शांती कशी मिळेल?’ वास्तविक असे म्हणणे चुकीचे आहे. तुम्ही आत्मा आहात, तुमचा स्वधर्मच शांत आहे. तुम्ही असे म्हणा की, ‘मज आत्म्याला शांती कशी मिळेल?’ यामध्ये कर्म तर करायचेच आहे. या गोष्टी बाबाच बसून समजावून सांगतात. दुनियेमध्ये हे ज्ञान कोणालाच नाहीये. तिथे आहे भक्तिमार्ग. त्यांना ज्ञाना विषयी तर माहीतच नाही. ज्ञान तर एक बाबाच देतात. बाबा स्वतः म्हणतात - ‘मी कल्प-कल्प, कल्पाच्या संगमयुगावर येतो’. कलियुगाच्या अंतामध्ये सर्वजण पतित आहेत. हे आहे रावण राज्य. रावणाला जाळतात देखील भारतवासीच. पतित-पावन बाबांचा जन्म देखील इथेच आहे. रावण जो सर्वांना पतित बनवतो, म्हणून त्याला जाळतात. या गोष्टी कोणाच्याही बुद्धीमध्ये नाहीत.

आता भारतामध्ये श्रीकृष्ण जयंती साजरी करतात. श्रीकृष्णाची लीला, भजन इत्यादी करतात. आता बाबा म्हणतात - वास्तविक श्रीकृष्ण लीला असे काहीही नाहीये. श्रीकृष्णाने काय केले! म्हणतात - कंसपुरीमध्ये जन्म घेतला. आता कंस तर असुराला म्हटले जाते. सतयुगामध्ये कंस कुठून आला. तुम्ही जाणता श्रीकृष्णाची आत्मा जी सतयुगामध्ये होती ती आपले ८४ जन्म भोगून आता या वेळी पतितापासून पावन बनत आहे. आपले पद पुन्हा घेत आहे. तसेच तुम्ही देखील कृष्णपुरीमध्ये राहणारे होता. ८४ जन्म घेऊन आता पुन्हा आपले पद घेत आहात. खरेतर जयंती साजरी करायची आहे - शिवबाबांची. जे शिवबाबा सर्वांना नरकातून स्वर्गामध्ये घेऊन जातात, त्यांची कोणतीही लीला नाहीये. म्हणतात की, ‘हे पतित-पावन बाबा या, येऊन आम्हाला नरकातून स्वर्गामध्ये घेऊन जा. तुम्ही आमचे पिता आहात तर आम्ही स्वर्गामध्ये असलो पाहिजे, आम्ही विशश दुनियेमध्ये (विकारी दुनियेमध्ये) का आहोत?’ म्हणून बोलावतात - ‘हे गॉड फादर, आम्हाला या दुःखाच्या दुनियेमधून लिबरेट करा’. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. बाबा म्हणतात - या ड्रामाला कोणीही जाणत नाही. शास्त्रांमध्ये ड्रामाचा कालावधी खूप दीर्घ लिहिला आहे. नवीन दुनियेला जुने व्हायचेच आहे. सतो, रजो, तमोमध्ये यायचेच आहे. ही आहे बेहदची गोष्ट. आता पुन्हा तुम्ही विश्वाचे मालक बनत आहात. भारतवासी जे नवीन दुनियेमध्ये होते, तेच ८४ जन्मांचा पार्ट बजावतील. आता तुम्ही पवित्र बनता, बाकी सर्व मनुष्य पतित आहेत, तेव्हाच तर पावन असणाऱ्यांसमोर जाऊन नमस्कार करतात. पावन असलेले, पावन असणाऱ्यांना नमस्कार का करतील. संन्यासी पावन आहेत तेव्हाच तर पतित मनुष्य त्यांच्यासमोर डोके टेकवतात. कन्या पवित्र असते तर सर्व तिच्यासमोर डोके टेकवतात. तीच कन्या लग्न करून सासरी गेली तर तिला डोके टेकवावे लागते. आता बेहदचे बाबा सर्वांना पावन बनविण्याकरिता आलेले आहेत. ते सर्व आहेत कलियुगामध्ये. तुम्ही आता आहात संगमावर. आता तुम्हाला पतित दुनियेमध्ये जायचे नाहीये. हे आहेच कल्याणकारी युग. बाबा येऊन सर्वांचे कल्याण करतात. तुम्ही आता श्रीकृष्ण जयंती साजरी कराल, नाहीतर लोक समजतील हे नास्तिक आहेत. खरेतर नास्तिक त्यांना म्हटले जाते जे आपल्या पित्याला आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणत नाहीत. यावेळी सर्व पोरके, अनाथ बनले आहेत. घराघरामध्ये भांडणे आहेत, एकमेकांना मारायला वेळ लावत नाहीत, म्हणूनच याला नास्तिकांची दुनिया म्हटले जाते, बाबांना न जाणणारे; तुम्ही आहात जाणणारे. आता तुम्ही समजता की आम्ही पत्थर-बुद्धी होतो, बाबा आम्हाला पारस-बुद्धी बनवत आहेत, अजून काहीही त्रासाची गोष्टच नाही. बाबा फक्त एवढेच सांगतात की, एक तास शिका. स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा. शरीराची आठवण कराल तर लौकिक नातेवाईकांची आठवण येईल. देही-अभिमानी होऊन राहाल तर मज पित्याची आठवण राहील. ही तर आहेच विशश दुनिया (विकारी दुनिया). विषय सागरामध्ये गोते खात राहतात. विष्णूला क्षीरसागरामध्ये दाखवतात. म्हणतात - तिथे तुपाच्या नद्या वाहतात. इथे तर घासलेट सुद्धा मिळत नाही. फरक आहे ना. तर तुम्हा मुलांना किती आनंद झाला पाहिजे. बाबाच खिवैया (नावाडी) आहेत ना. गातात देखील - ‘नईया मेरी पार लगाओ’. या सर्व बोटी आहेत, नावाडी एक बाबाच आहेत. हे शरीर इथेच सोडून देणार. बाकी आत्म्यांना पार पलीकडे शांतीधामला घेऊन जातील. तिथून मग सुखधामला पाठवतील. परमपिता परमात्म्यालाच नावाडी म्हटले जाते. बाबांचीच महिमा अनेक प्रकारे गातात. आता तुम्ही पवित्र बनून पवित्र दुनियेचे मालक बनता. श्री श्री शिवबाबा आले आहेत श्रेष्ठ बनविण्याकरिता. स्वयं भगवान म्हणत आहेत की, ही भ्रष्टाचारी दुनिया आहे. आता तुम्ही परमपिता परमात्म्याच्या श्रीमतावर चालून श्रेष्ठाचारी बनता. या किती गुप्त आणि मनोरंजक गोष्टी आहेत, ज्या तुम्हा मुलांच्याच लक्षात येतात. इतरांना समजणार सुद्धा नाहीत. तुम्ही जाणता की आता देवी-देवता धर्माचे कलम लागत आहे. जे कोणी देवी-देवता धर्माचे इतर धर्मांमध्ये निघून गेले आहेत, तेच येऊन पुन्हा ब्राह्मण बनतील. ब्रह्माकुमार-कुमारी बनल्याशिवाय बाबांकडून स्वर्गाचा वारसा घेऊ शकत नाही. आता तुम्ही ब्रह्माकुमार-कुमारी स्वर्गाचा वारसा घेत आहात. जितका पुरुषार्थ कराल आणि इतरांकडून करवून घ्याल तितके उच्च पद प्राप्त कराल. सगळेच काही इतके करू शकणार नाहीत. जर नीट शिकले नाहीत तर त्याचा परिणाम काय होईल? जर शरीर सुटले तर स्वर्गामध्ये येतील. परंतु प्रजेमध्ये अगदीच साधारण पद प्राप्त करतील. जर बाबांचे बनून व्यवस्थित शिकतील तेव्हाच तर राजाई पद प्राप्त करू शकतील. जर नीट शिकत नसतील तर समजणार त्यांच्या भाग्यामध्ये नाहीये. पवित्र राहाल, अभ्यास कराल तर उच्च पद प्राप्त कराल. अपवित्र बनल्यामुळे बाबांची आठवण करू शकणार नाहीत. असे देखील अनेक आहेत - कर्मबंधनाचा हिशोब जेव्हा सुटेल तेव्हा. गाडीची दोन्ही चाके पवित्र असतील तर गाडी ठीक चालेल. दोन्ही पवित्र राहतील तर ज्ञान-चितेवर बसून जातील, नाहीतर कटकट होते.

बरीच मुले असे म्हणतात की, ‘बाबा, आम्ही तर जाणतो श्रीकृष्ण सतयुगाचा पहिला प्रिंस आहे, तर का नाही काही साजरे करावे. अच्छा, आम्ही श्रीकृष्णाच्या आत्म्याला बोलावू देखील शकतो. येऊन खेळेल, रास करेल, अजून काय करेल. गोप-गोपी तर इथेच असतात. तिथे तर प्रिन्स-प्रिन्सेस एकमेकांना भेटतात तेव्हा रास करतात. सोन्याची मुरली वाजवतात. या सर्व खेळ-क्रीडा तुम्ही शेवटी बघाल. हे सर्व पार्ट चालतील. सुरुवातीला दाखवला गेला होता आणि नंतर तुम्ही पुरुषार्थाला लागले आहात. आता पुन्हा अखेरीला साक्षात्कार होणे सुरू होईल. कोण-कोण कोणते पद प्राप्त करतील, हे तुम्ही जाणता. बाबा बसून हे सर्व रहस्य समजावून सांगतात. तुम्हाला विचारतात तुम्ही वेदांना, शास्त्रांना मानता का! तुम्ही बोला - ‘होय, का नाही मानणार.’ ही सर्व भक्तिमार्गाची सामग्री आहे, यामध्ये कोणतेही ज्ञान नाहीये. ज्ञान देणारे तर एकच आहेत. ज्ञान मिळते तेव्हा भक्ती आपोआप सुटते. तुम्ही मंदिरामध्ये देखील जाल तर बुद्धीमध्ये राहील की हे लक्ष्मी-नारायण आता पुन्हा नवीन दुनियेमध्ये राज्य करतील.

बाबा मुलांना समजावून सांगत आहेत - दोन्ही बाजूने तोड निभावायची आहे. गृहस्थ-व्यवहारामध्ये राहत असताना पवित्र बनायचे आहे. श्रीमत म्हणते संपूर्ण पवित्र बना, संपूर्ण वैष्णव बना आणि विष्णुपुरीचे राज्य घ्या. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) ‘योग’द्वारा कर्मबंधनाचा हिशोब चुकता करून, पावन बनायचे आहे. ज्ञान-चितेवर बसायचे आहे. पूर्णपणे वैष्णव अर्थात पवित्र बनायचे आहे.

२) आपल्या शांत स्वधर्मामध्ये स्थित राहायचे आहे. सर्वांना शांतीधामची आठवण करून द्यायची आहे. कधीही अशांत व्हायचे नाही.

वरदान:-
आवाजापासून परे अशा स्थितीमध्ये स्थित होऊन सर्व गुणांचा अनुभव करणारे मास्टर बीजरूप भव

जसे बीजामध्ये संपूर्ण वृक्ष सामावलेला असतो तसेच आवाजापासून परे स्थितीमध्ये संगमयुगातील सर्व विशेष गुणांचा अनुभव घेता येतो. मास्टर बीजरूप बनणे अर्थात केवळ शांती नव्हे परंतु शांती सोबतच ज्ञान, अतिंद्रिय सुख, प्रेम, आनंद, शक्ती इत्यादी-इत्यादी सर्व मुख्य गुणांचा अनुभव करणे. हे अनुभव फक्त स्वतःलाच होत नाहीत परंतु इतर आत्म्यांना देखील त्यांच्या चेहऱ्यावरून सर्व गुणांचा अनुभव होतो. एका गुणामध्ये सर्व गुण सामावलेले असतात.

बोधवाक्य:-
चांगलेपणा धारण करा परंतु चांगलेपणावर प्रभावित होऊ नका.

हे अव्यक्त इशारे - अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.

पवित्रता तुम्हा ब्राह्मण आत्म्यांचा अनादि आदि संस्कार आहे, या नॅचरल संस्कारामध्ये स्वप्न अथवा संकल्पामध्ये देखील अपवित्रता इमर्ज होऊ नये. संकल्प आला आणि विजयी बनला; आता याच्याही पलीकडे जाऊन पवित्रतेला तुमचा नॅचरल संस्कार बनवा. म्हणजे मग या सब्जेक्टमध्ये पुरुषार्थ करण्याची आवश्यकता राहणार नाही.