24-07-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, या महाभारत युद्धामध्ये जुने झाड नष्ट होणार आहे, म्हणून युद्धाच्या आधी बाबांकडून संपूर्ण वारसा घ्या”

प्रश्न:-
बाबांना मातांचे संघटन हवे आहे, परंतु त्या संघटनची विशेषता काय असेल?

उत्तर:-
अशी संघटना असावी जी देही-अभिमानी राहण्याचा पूर्णपणे पुरुषार्थ करेल. ज्यांना पक्का नशा असेल की आम्हाला पावन बनून पावन दुनिया बनवायची आहे. पतित बनायचे नाही. नष्टोमोहा ग्रुप असावा तेव्हा काही चमत्कार करून दाखवेल. कोणातही आसक्ती असता कामा नये. मोहाची आसक्ती खूप नुकसान करते.

ओम शांती।
गोड-गोड मुले हे जाणतात की, गोड बाबा आम्हाला स्वर्गवासी बनविण्यासाठी इथे आले आहेत. हे मुलांच्या बुद्धीमध्ये आहे. प्रत्येकाला हे समजावून सांगायचे आहे की आपण आत्मे या आठवणीच्या यात्रेने पवित्र बनतो. किती सोपा उपाय आहे, फक्त बाबांची आठवण करायची आहे. मुले जाणतात की, बाबा एका सेकंदामध्ये मुक्ती-जीवनमुक्तीचा वारसा देत आहेत. आता सर्वजण जीवनबंध मध्ये आहेत, रावण-राज्याच्या बंधनामध्ये आहेत. ही गोष्ट बाबा जाणतात आणि मुले जाणतात, इतर कोणीही जाणत नाहीत. तुम्हा मुलांना निश्चय आहे की, आम्ही बेहदच्या बाबांची आठवण करतो. तर आत्म्याला आतून खूप आनंद झाला पाहिजे की, ज्या बाबांची अर्धा कल्प आठवण करत होतो, ते बाबा भेटले. दुःखात बाबांच्या नावाचा जप करत राहतात. तुम्ही देखील जप करत होता, आता तुम्ही दुःखी होऊन जप करत नाही. ज्यांच्या नावाचा जप सारी दुनिया करते ते बाबा आलेले आहेत, हे तुम्ही जाणता. बाबांनी पुन्हा-पुन्हा समजावून सांगितले आहे - जेव्हा तुम्ही इथे बसता तेव्हा असे समजा की, आपण आत्मा आहोत. बाबा परमधामहून आलेले आहेत. ते कल्प-कल्प आपल्या वायद्यानुसार येतात. बाबांची ही प्रतिज्ञा आहे की तुम्ही जेव्हा बोलवाल आणि अर्धे कल्प जेव्हा पूर्ण होते तेव्हा मला यावे लागते. कलियुगाच्या नंतर सतयुग येणार आहे तेव्हा मला यावे लागते. हे फक्त तुम्हा मुलांना ठाऊक आहे की हे संगमयुग आहे, बाबा आलेले आहेत. तुम्ही मुले देखील सेवा करता, दिवसेंदिवस परिचय देत जाता, बाबांची ओळख सर्वांना मिळत जाते. आता इथे बसला आहात, तुम्ही जाणता की बेहदचे बाबा शिवबाबा आम्हाला पुन्हा बेहदचा वारसा देण्यासाठी आले आहेत. तुम्ही ‘बाबा-बाबा’ म्हणता ना. आपण शिवबाबांकडे आलो आहोत. शिवबाबा देखील म्हणतात की, ‘कल्पापूर्वी प्रमाणे मी सामान्य तनामध्ये आलो आहे’. हे विसरता कामा नये. माया अशा बाबांची आठवण विसरायला लावते, ज्यांच्या आठवणीने पतितापासून पावन बनायचे असते. तुम्ही जाणता की सर्वांचे सद्गती-दाता एकच सद्गुरू आहेत. शीख लोक देखील गातात - ‘सत श्री अकाल’, ‘पतित-पावन’लाच सद्गुरु म्हटले जाते. बोलावतात देखील की, ‘हे पतित-पावन’. आत्मा बोलावते. आता तुम्ही जाणता - आपण इथे आलो आहोत बाबांना सन्मुख भेटण्याकरिता. मोठ्या व्यक्ती जेव्हा एकमेकांना भेटण्यासाठी जातात, तर त्यांची महिमा किती होते. एकमेकांचे धूमधडाक्यात स्वागत करण्यासाठी ढोल-ताशा इत्यादी वाजवून आनंद व्यक्त करतात. हे गुप्त वेषामध्ये कोण आलेले आहेत हे तुम्हीच जाणता. त्यांना म्हटले जाते दूर-देशात राहणारे प्रवासी.

तुम्ही जाणता आपण आत्मे परमधाम मध्ये राहणारे आहोत. इथे प्रवासी बनून पार्ट बजावण्यासाठी आलो आहोत. बाबा एक-एक शब्द जे समजावून सांगतात ते दुनियेमध्ये कोणीही जाणत नाहीत. तुम्ही बाबांकडून ऐकत आहात. ते चांगल्या प्रकारे धारण केले पाहिजे. बाबा म्हणतात - तुम्ही सर्व या कर्मक्षेत्रावरचे प्रवासी आहात. आपण शांतीधामचे रहिवासी आहोत, नंतर मग इथे टॉकी वर्ल्डमध्ये (आवाजाच्या दुनियेमध्ये) येतो. आम्ही शांतीधामचे मुसाफिर आहोत, ८४ जन्मांचा पार्ट इथे बजावतो. शेवटी हा अंतिम समय आहे. तर बाबा आलेले आहेत - जुन्या सृष्टीला नवीन बनविण्यासाठी. हे देखील तुम्ही जाणता. चित्र देखील स्पष्ट आहे शिवबाबा ब्रह्मा द्वारे नवीन दुनियेची स्थापना करत आहेत. असे तर नाही की, श्रीकृष्णा द्वारे, विष्णू द्वारे स्थापना करतात. बाबा येतातच ब्रह्माद्वारे स्वर्ग रचण्याकरिता. बाबा आले आहेत साधारण तनामध्ये. ही आहेच पतित दुनिया, एकही पावन नाहीये. जेव्हा की पहिल्या नंबरवाले लक्ष्मी-नारायण सुद्धा पतित बनतात. जे पावन होते तेच पूर्ण घराण्यासहित पतित बनतात. तुम्ही जाणता आम्ही जे देवता धर्माचे होतो ते आता शूद्र धर्माचे बनलो आहोत. भले अमेरिका इत्यादी ठिकाणी मोठ-मोठे श्रीमंत राहतात, परंतु सतयुगाच्या समोर अमेरिका काहीच नाही. हे सर्व नंतर बनले आहेत. हा अल्पकाळाचा भपका आहे. विनाश तर होणारच आहे. तुम्हा मुलांना खूप चांगला नशा असला पाहिजे. बाबा, जे आम्हाला स्वर्गाचा मालक बनवत आहेत, त्यांची आपण मुले आठवण सुद्धा करत नाही केवढे मोठे आश्चर्य आहे. माया आठवण करू देत नाही. तुम्ही मुले आता असे म्हणता - ‘बाबा, माया आम्हाला आठवण करू देत नाही’. अरे बाबा, जे तुम्हाला २१ जन्मांसाठी स्वर्गाचा मालक बनवतात, त्यांची तुम्ही आठवण करू शकत नाही? प्रजा सुद्धा स्वर्गाची मालक तर बनते ना. सर्व सुखी असतात. आता तर सर्व दुःखी आहेत. प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट इत्यादींना तर रात्रं-दिवस चिंता लागून राहते. युद्ध इत्यादी मध्ये किती मृत्युमुखी पडतात. तुम्ही जाणता महाभारताची लढाई सुद्धा प्रसिद्ध आहे, परंतु त्या युद्धामध्ये काय झाले होते, हे कोणाच्याच बुद्धीमध्ये नाहीये. तुमच्या बुद्धीमध्ये बाबांनी हे पक्के केले आहे. महाभारताच्या लढाईमध्ये सगळेच मेले! केवढी मोठी मनुष्य सृष्टी आहे. आत्म्यांचे देखील झाड आहे. झाड सुरवातीला नवे असते तेव्हा खूप छोटे असते, नंतर मग वृद्धिंगत होत जाते. तुम्ही जाणता पहिल्यांदा जेव्हा देवता धर्म होता तेव्हा झाड किती छोटे होते. आदि सनातन देवता धर्म होता. आता किती व्हरायटी धर्म आहेत. या महाभारत युद्धा द्वारे या सर्वांचा विनाश होणार आहे. परंतु हे ज्ञान कोणालाच नाहीये. भले म्हणतील - ‘हे तेच युद्ध आहे’, परंतु याने काय होणार आहे हेच ठाऊक नाहीये. तुम्ही आता प्रकाशामध्ये आहात. जाणता की, विनाश होणारच आहे त्यामुळे महाभारताच्या युद्धापूर्वी आपला वारसा तरी घ्यावा. गोष्ट तर खूप सोपी आहे. पवित्र बना आणि बाबांची आठवण करा. अनेक मुलींवर अत्याचार होतात. तुम्हा मातांनी एकमेकींच्या संरक्षणासाठी एखादी संघटना स्थापन केली पाहिजे. परंतु देही-अभिमानी जरूर बनावे लागेल. आम्हाला पावन जरूर बनायचे आहे - हा पक्का नशा पाहिजे. अशा नशेमध्ये राहणारेच हे ज्ञान इतरांना समजावून सांगू शकतील. आपल्याला बाबांची आठवण करायची आहे, पवित्र बनायचे आहे. आम्ही स्वदर्शन चक्रधारी आहोत - हा नशा तरी राहिला पाहिजे. आम्ही रचयिता बाबा आणि रचनेच्या चक्राला जाणतो. आता आम्हाला बाबांकडून नवी दुनिया सतयुगाचा वारसा घ्यायचा आहे. आम्ही ८४ जन्म कसे घेतो हे सांगत राहा. बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील. पावन तर जरूर बनायचे आहे. पावन अर्थात पवित्र. कामविकार महाशत्रू आहे. आपण ८४ जन्मांचे चक्र पूर्ण केले आहे, आता बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील’. इथे तर येताच मुळी रिफ्रेश होण्यासाठी. मज पित्याची आठवण करा; २१ जन्मांचा वारसा घ्यायचा आहे. कोणाबद्दलही मोहाची आसक्ती राहता कामा नये. नष्टोमोहा बनायचे आहे. या शरीरामध्ये देखील मोह राहू नये. हे तर जुने चामडे (शरीर) आहे. परंतु याची काळजी घ्यायची आहे, ज्यामुळे अभ्यास करू शकाल. त्रास झाला तर ठिगळ लावावे लागते (औषध पाणी करावे लागते). तुम्ही जाणता हे जुने सडलेले शरीर आहे. याला काही ना काही होत राहते. दुःख आत्म्याला होते. तुम्ही जाणता की आता तर हे शरीर सोडायचे आहे. योगबलाने याला टिकवून ठेवायचे आहे. बाबांची आठवण करत राहायची आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे, बस्स. बाकी कोणतीही लौकिक नाती सुद्धा आठवता कामा नये. मी देह नाही आत्मा आहे. बाबा म्हणतात - मी तुम्हा आत्म्यांना वारसा देण्यासाठी आलो आहे. आत्मा पवित्र असेल तेव्हा मग शरीरदेखील चांगले मिळेल.

तुम्ही जाणता आता आपली आत्मा पावन बनणार आहे. आपण पावन होतो तेव्हा या लक्ष्मी-नारायणासारखे होतो. या लक्ष्मी-नारायणाने ८४ जन्म घेतले आहेत. सर्व सूर्यवंशी घराण्याने ८४ जन्म घेतले आहेत. चंद्रवंशींसाठी ८४ जन्म म्हणणार नाही. हां, सूर्यवंशीमध्ये जे सुरुवातीला दास-दासी बनत असतील ते मग त्रेतामध्ये थोडेफार पद मिळवतात, त्यांचे ८४ जन्म म्हणता येतील. राजा-राणी, प्रजा जे काही दास-दासी इत्यादी सूर्यवंशीमध्ये येतात तेच ८४ जन्म घेतात. अशा प्रकारे स्वतःशी गोष्टी करायच्या आहेत. आपण ८४ जन्म कसे घेतो, विचार सागर मंथन केले पाहिजे. जितके शक्य असेल तितकी बाबांची आणि वारशाची आठवण करत रहा. चालता-फिरता हेच समजा की, आम्ही बाबांची मुले आहोत. कोणीही भेटले तर त्यांना बाबांचा परिचय द्यायचा आहे. या चित्रांमध्ये सर्व नॉलेज आहे. सर्व सांगायचे आहे. बाबा आले आहेत ब्रह्मा तनामध्ये. आपण सर्व ब्रह्माकुमार-कुमारी आहोत ना. आम्हा बी.कें. ना स्वर्गाचा मालक बनविण्याकरिता बाबा आलेले आहेत. सर्व आत्म्यांचा पिता एकच आहे. आपण ब्रह्माकुमार-कुमारी आहोत. तुम्ही आपापली ओळखपत्रे देखील दाखवू शकता. एखाद्या कार्यालय इत्यादी ठिकाणी देखील ओळखपत्र दाखवा, परंतु तरीही हे समजू शकणार नाहीत की, ‘बी. के.’ कोण आहेत! अनेक प्रकारची विघ्ने येतात. गव्हर्मेंटला देखील संगितले जाते की - ‘हे आमचे कुटुंब आहे’. दादा आणि बाबा आहेत. दादांच्याद्वारे आम्ही वारसा घेत आहोत, याची आठवण केल्यावर तुम्हाला आनंद झाला पाहिजे. संपत्ती तर आजोबांची आहे. नातवंडांचा हक्क आहे, सर्व गोष्टी वाटून घेतात.

तुम्ही देखील जाणता शिवबाबांकडून ब्रह्माद्वारे आपण वारसा घेत आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे. शिकायचे आहे आणि मग शिकवायचे आहे. मुलांचे संगोपन करणे हे पित्याचे कर्तव्य आहे. जोपर्यंत कुमार-कुमारी सज्ञान होत नाहीत तोपर्यंत पित्याने त्यांची काळजी घ्यायची आहे. मुलांचे काम आहे शिकणे. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिकतात. तुम्ही जाणता - बाबा आम्हाला २१ जन्मांच्यासाठी शिकवत आहेत. नंतर मग आम्ही आपल्या पायावर उभे राहू. जितके शिकाल तितके उच्च पद प्राप्त कराल. तुम्ही स्वतः म्हणता की, आम्ही इथे श्री लक्ष्मी अथवा श्री नारायण बनण्यासाठी येतो. ही सत्यनारायणाची कथा आहे ना. कोणालाच ठाऊक नाहिये की हे लक्ष्मी-नारायण ८४ जन्म कसे घेतात. राधेचे भक्त असतील तर म्हणतील - ‘राधे हाजिरा-हजूर आहे (राधा उपस्थित आहे)’, जिकडे बघावे तिकडे राधाच राधा आहे, श्रीकृष्णच श्रीकृष्ण आहे, शिवच शिव आहे. अशी गडबड केली आहे. ईश्वर, राधा, श्रीकृष्ण सगळे सर्वव्यापी आहेत. ही सर्व ईश्वराची रूपे आहेत. भगवंताने ही रूपे धारण केली आहेत. जिकडे बघावे तिकडे तूच तू आहेस… अगदीच निर्बुद्ध बनले आहेत. ही आहे - विकारी पतित दुनिया. सतयुग आहे - निर्विकारी पावन दुनिया. व्हाइसलेस वर्ल्ड (निर्विकारी दुनिया) याचा अर्थच आहे स्वर्ग. म्हणतात - तिथे मुले तर आहेत ना. ती कशी जन्माला येतील. बस्स, प्रश्नच विचारत बसतील. म्हणतील मुले जन्मली नाहीत तर सृष्टीची वृद्धी कशी होईल? दरवर्षी जनगणनेचा हिशोब काढतात की, लोकसंख्या कितीने वाढली आहे. हे मात्र सांगत नाहीत की, इतके मेले. म्हणून मुलांना तर आधी आपले कल्याण करायचे आहे. ‘मी आत्मा आहे’ - अगोदर हा निश्चय करा. बाबांची आठवण करायची आहे. ‘अंतकाल जो नारायण सिमरे…’ आता ‘नारायण सिमरे’ हे खोटे शब्द लिहिले आहेत. अंतकाल जो शिवबाबा सिमरे… त्याच चिंतनामध्ये जो मरेल, तो स्वर्गाचा नारायण बनेल. अंतकाल ‘नारायण’ का म्हणतात? समजतात श्रीकृष्णाने ज्ञान दिले होते; तर मग श्रीकृष्णाचे स्मरण करा ना. श्रीकृष्णाची आठवण करतात. नारायणा बद्दल कोणालाच ठाऊक नाहीये. श्रीकृष्णाची जयंती साजरी करतात, मग राधेची जयंती कुठे गेली? श्रीकृष्णाचा जन्मदिन साजरा करतात, नारायणाचा कुठे आहे? विश्वाचे महाराजा-महाराणी लक्ष्मी-नारायणाबद्दल तर कोणाला माहीत सुद्धा नाहीये. ते प्रजापिता ब्रह्माची मुखवंशावळी असतील ना! मग कुठे गेले? म्हणतात - ब्राह्मण देवी-देवता नमः. ब्रह्माची मुखवंशावळी होते ना. मुले समजतात शिवबाबा, ब्रह्मा द्वारे ब्राह्मण धर्म स्थापन करतात. ब्राह्मण धर्म काही ब्रह्माने रचलेला नाहीये, तर शिवबाबांनी रचला आहे. हे तर आता ब्रह्मा बनले आहेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या जुन्या शरीरामध्ये राहत असताना अभ्यास शिकून २१ जन्मांसाठी कमाई करायची आहे; म्हणून शरीराची काळजी घ्यायची आहे. बाकी या शरीराबद्दल आसक्ती बाळगायची नाही.

२) असा अभ्यास करायचा आहे की, अंतकाळामध्ये एक शिवबाबाच लक्षात राहतील. दुसऱ्या कोणत्याही चिंतनामध्ये जायचे नाही. आपले स्वतःचे कल्याण करायचे आहे.

वरदान:-
मास्टर नॉलेजफुल बनून अनभिज्ञता (अजाणतेपणाला) नाहीसे करणारे ज्ञान स्वरूप, योगयुक्त भव

मास्टर नॉलेजफुल बनणाऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा अजाणतेपणा असत नाही. ते, ‘या गोष्टीची मला कल्पनाच नव्हती’ असे म्हणून स्वतःला सोडवू शकत नाहीत. ज्ञानस्वरूप मुलांमध्ये कुठल्याही गोष्टीचे अज्ञान राहू शकत नाही; आणि जे योगयुक्त असतात त्यांना हाच अनुभव होतो की, जणूकाही त्यांना आधीपासूनच सर्व काही ठाऊक आहे. त्यांना हे ठाऊक असते की, मायेची छम-छम, रिमझिम काही कमी नाहीये; माया देखील खूप आकर्षक आहे, म्हणून तिच्यापासून जरा जपून राहायचे आहे. ज्यांनी मायेच्या नॉलेजला सर्व प्रकारे समजून घेतले आहे, त्यांचा पराभव होणे असंभव आहे.

बोधवाक्य:-
जो सदैव ‘प्रसन्नचित्त’ असतो तो कधीही ‘प्रश्नचित्त’ होऊ शकत नाही.

हे अव्यक्त इशारे - ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.

‘योग’मध्ये सदैव लाईट हाऊस आणि माईट हाऊस स्थितीचा अनुभव करा. ज्ञान आहे - लाईट आणि योग आहे - माईट. ज्ञान आणि योग - लाईट आणि माईट या दोन्ही शक्तींनी संपन्न असावा, याला म्हणतात - मास्टर सर्वशक्तिमान. असे शक्तिशाली आत्मे कोणत्याही परिस्थितीला सेकंदामध्ये पार करतात, वेळ लागत नाही.