06-12-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - हे शरीर रूपी खेळणे आत्मा रूपी चैतन्य चावीने चालते, तुम्ही स्वतःला आत्मा समजलात तर निर्भय बनाल”

प्रश्न:-
आत्मा शरीरासोबत खेळ खेळत खाली आली आहे, त्यामुळे तिला कोणते नाव द्याल?

उत्तर:-
कठपुतळी. जसे ड्रामामध्ये कठपुतळ्यांचा खेळ दाखवतात तसे तुम्ही आत्मे कठपुतळीप्रमाणे ५ हजार वर्षांमध्ये खेळ खेळत खाली पोहोचला आहात. बाबा आले आहेत तुम्हा कठपुतळ्यांना वरती चढण्याचा मार्ग सांगण्याकरिता. आता तुम्ही श्रीमताची चावी लावा तर वरती निघून जाल.

गीत:-
महफिल में जल उठी शमा...

ओम शांती।
रूहानी बाबा रूहानी मुलांना श्रीमत देत आहेत - कधी एखाद्याचे चारित्र्य चांगले नसले तर आई-वडील म्हणतात - ‘तुला ईश्वर कधीतरी मत देवो (सद्-बुद्धी देवो)’. बिचाऱ्यांना हेच ठाऊक नाही आहे की ईश्वर खरोखरच मत देत आहेत. आता तुम्हा मुलांना ईश्वरीय मत मिळत आहे अर्थात रूहानी बाबा मुलांना श्रेष्ठ बनण्यासाठी श्रेष्ठ मत देत आहेत. आता तुम्ही समजता आपण श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनत आहोत. बाबा आम्हाला किती श्रेष्ठ मत देत आहेत. आम्ही त्यांच्या मतावर चालून मनुष्यापासून देवता बनत आहोत. तर सिद्ध होते की मनुष्याला देवता बनविणारे तेच बाबा आहेत. शीख लोक देखील गातात - ‘मनुष्य से देवता किये…’ तर जरूर मनुष्यापासून देवता बनण्याचे मत देतात. त्यांची महिमा देखील गायली आहे - ‘एक ओंकार… कर्ता पुरुष, निर्भय…’ तुम्ही सर्व निर्भय होता. स्वतःला आत्मा समजता ना. आत्म्याला कोणतीही भीती नसते. बाबा म्हणतात - निर्भय बना. मग भय कसले? तुम्हाला कसलीच भीती नाही. तुम्ही आपल्या घरी बसून देखील बाबांचे श्रीमत घेत राहता. आता श्रीमत कोणाचे? कोण देतात? या गोष्टी गीतेमध्ये काही नाही आहेत. आता तुम्ही मुले समजता. बाबा म्हणतात - ‘तुम्ही पतित बनला आहात, आता पावन बनण्यासाठी मामेकम् (मज एकाची) आठवण करा’. हा पुरुषोत्तम बनण्याचा सोहळा संगमयुगातच असतो. पुष्कळजण येऊन श्रीमत घेतात. याला म्हटले जाते ईश्वरा सोबत मुलांचा उत्सव. ईश्वर देखील निराकार आहेत. मुले (आत्मे) देखील निराकार आहेत. आपण आत्मा आहोत ही पक्की-पक्की सवय लावायची आहे. जशी खेळण्याला चावी दिली की नाच करू लागते. तर आत्मा देखील या शरीर रूपी खेळण्याची चावी आहे. यामध्ये (शरीरामध्ये) आत्मा नसेल तर काहीही करू शकणार नाही. तुम्ही आहात चैतन्य (सजीव) खेळणी. खेळण्याला चावी दिली नाही तर ते कामाचे राहणार नाही. उभेच राहील. आत्मा देखील चैतन्य चावी आहे आणि ही अविनाशी, अमर चावी आहे. बाबा समजावून सांगतात - मी आत्म्यालाच बघतो. आत्मा ऐकत आहे - ही सवय पक्की करायची आहे. या चावी शिवाय शरीर चालू शकणार नाही. यांना देखील अविनाशी चावी मिळालेली आहे. ही चावी ५ हजार वर्षे चालते. चैतन्य चावी असल्यामुळे चक्र फिरतच राहते. ही आहेत चैतन्य खेळणी. बाबा देखील चैतन्य आत्मा आहेत. जेव्हा चावी पूर्ण संपते तेव्हा मग बाबा नव्याने युक्ती सांगतात की, माझी आठवण करा तर मग चावी लागेल अर्थात आत्मा तमोप्रधानापासून सतोप्रधान बनेल. जसे गाडीतील पेट्रोल संपल्यावर पुन्हा भरले जाते ना. आता तुमची आत्मा समजते - आपल्यामध्ये पेट्रोल कसे भरेल! बॅटरी संपली की पुन्हा त्यामध्ये पॉवर भरली जाते ना. बॅटरी संपते तेव्हा लाईट बंद होते. आता तुमची आत्मा रूपी बॅटरी भरत आहे. जितकी आठवण कराल तितकी पॉवर भरली जाईल. इतके ८४ जन्मांचे चक्र फिरल्यामुळे बॅटरी संपून गेली आहे. सतो, रजो, तमो मध्ये आली आहे. आता बाबा पुन्हा चावी देण्यासाठी किंवा बॅटरी भरण्यासाठी आले आहेत. पॉवर नसेल तर मनुष्य कसे बनतात. तर आता आठवणीनेच बॅटरीला भरायचे आहे, याला मानवी बॅटरी म्हणा. बाबा म्हणतात - माझ्याशी योग लावा. हे ज्ञान एक बाबाच देतात. सद्गती दाता ते एक बाबाच आहेत. आता तुमची बॅटरी पूर्ण भरत आहे, ज्यामुळे मग तुम्ही ८४ जन्म पूर्ण पार्ट बजावता. जशा ड्रामामध्ये कठपुतळ्या नाचतात ना. तुम्ही आत्मे देखील असे कठपुतळ्यांसारखे आहात. वरुन उतरत ५ हजार वर्षांमध्ये एकदम खाली येता, मग बाबा येऊन वर चढवतात. ते तर एक खेळणे आहे. बाबा चढती कला आणि उतरती कला याचा अर्थ समजावून सांगतात, ५ हजार वर्षांची गोष्ट आहे. तुम्ही समजता श्रीमतामुळे आपल्याला चावी मिळत आहे. आम्ही पूर्ण सतोप्रधान बनणार आणि मग संपूर्ण पार्ट रिपीट करणार. समजून घेण्यासाठी आणि समजावून सांगण्यासाठी किती सोपी गोष्ट आहे. तरीही बाबा म्हणतात - समजेल त्यांनाच ज्यांना कल्पा पूर्वी समजले असेल. तुम्ही कितीही डोके आपटा, जास्त समजणारच नाही. बाबा ज्ञान तर सर्वांना एकसारखेच देतात. कुठेही बसून बाबांची आठवण करायची आहे. भले समोर ब्राह्मणी नसेल तरी देखील तुम्ही आठवणीमध्ये बसू शकता. ठाऊक आहे की, बाबांच्या आठवणीनेच आपली विकर्म विनाश होतील. तर त्या आठवणीमध्ये बसायचे आहे. कोणाला बसवण्याची आवश्यकता नाही. खाता-पिता, आंघोळ इत्यादी करताना बाबांची आठवण करा. थोडावेळ दुसरे कोणी समोर बसते, तर असे नाही की ते तुम्हाला मदत करतात, नाही. प्रत्येकाने स्वतःलाच मदत करायची आहे. ईश्वराने तर मत दिले आहे की असे-असे करा तर तुमची दैवी-बुद्धी बनेल. हे प्रलोभन दिले जाते. श्रीमत तर सर्वांना देत राहतात. इतके जरूर आहे की कोणाची बुद्धी मंद आहे, कोणाची तीक्ष्ण आहे. पावनसोबत (बाबांसोबत) योग लागत नसेल तर बॅटरी चार्ज होणार नाही. बाबांचे श्रीमत मानत नाहीत. योग लागतच नाही. तुम्हाला आता जाणीव होते की आपली बॅटरी भरत चालली आहे. तमोप्रधानापासून सतोप्रधान तर जरूर बनायचे आहे. यावेळी तुम्हाला परमात्म्याचे श्रीमत मिळत आहे. हे दुनिया अजिबात समजत नाही. बाबा म्हणतात - माझ्या या मतामुळे तुम्ही देवता बनता, यापेक्षा श्रेष्ठ गोष्ट कोणती असत नाही. तिथे हे ज्ञान असत नाही. हा देखील ड्रामा बनलेला आहे. तुम्हाला पुरुषोत्तम बनविण्याकरिता बाबा संगमावरच येतात, ज्यांचे मग यादगार (आठवण) भक्तिमार्गामध्ये साजरी करतात, दसरा देखील साजरा करतात ना. जेव्हा बाबा येतात तेव्हा दसरा होतो. ५ हजार वर्षांनंतर प्रत्येक गोष्ट रिपीट होते.

तुम्हा मुलांनाच हे ईश्वरीय मत अर्थात श्रीमत मिळते, ज्याद्वारे तुम्ही श्रेष्ठ बनता. तुमची आत्मा सतोप्रधान होती, ती उतरत-उतरत तमोप्रधान भ्रष्ट बनते. मग बाबा बसून ज्ञान आणि योग शिकवून सतोप्रधान श्रेष्ठ बनवतात. बाबा सांगतात, तुम्ही शिडी खाली कसे उतरता. ड्रामा चालत राहतो. या ड्रामाच्या आदि-मध्य-अंताला कोणीही जाणत नाहीत. बाबांनी समजावून सांगितले आहे, आता तुम्हाला स्मृती आली आहे ना. प्रत्येकाच्या जन्माची कहाणी तर ऐकवू शकणार नाहीत. लिहिली जात नाही जी वाचून ऐकवली जाईल. हे बाबा बसून समजावून सांगत आहेत. आता तुम्ही सो ब्राह्मण बनला आहात, मग सो देवता बनायचे आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे - ब्राह्मण, देवता, क्षत्रिय तिन्ही धर्म मी स्थापन करतो. आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे - आपण बाबांद्वारे ब्राह्मण वंशी बनतो नंतर मग सूर्यवंशी, चंद्रवंशी बनणार. जे नापास होतात ते चंद्रवंशी बनतात. कशामध्ये नापास होतात? योगामध्ये. ज्ञान तर खूप सोपे सांगितले आहे. कसे तुम्ही ८४ चे चक्र फिरता. मनुष्य तर ८४ लाख म्हणतात तर किती दूर गेले आहेत. आता तुम्हाला मिळत आहे - ईश्वरीय मत. ईश्वर तर येतातच एकदा. तर त्यांचे मत देखील एकदाच मिळेल. एक देवी-देवता धर्म होता. जरूर त्यांना ईश्वरीय मत मिळाले होते, त्याच्या आधी तर होते संगमयुग. बाबा येऊन दुनियेला परिवर्तित करतात. तुम्ही आता परिवर्तित होत आहात. यावेळी तुम्हाला बाबा परिवर्तित करतात. तुम्ही म्हणाल कल्प-कल्प आम्ही परिवर्तित होत आलो आहोत, परिवर्तित होतच राहणार. ही चैतन्य बॅटरी आहे ना. ती आहे जड. मुलांना ठाऊक झाले आहे - ५ हजार वर्षानंतर बाबा आले आहेत. श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत देखील देतात. उच्च ते उच्च भगवंताचे उच्च मत मिळते - ज्याद्वारे तुम्ही उच्च पद प्राप्त करता. तुमच्याकडे जेव्हा कोणी येतात तर बोला - तुम्ही ईश्वराची संतान आहात ना. ईश्वर, शिवबाबा आहेत, शिवजयंती देखील साजरी करतात. ते आहेत देखील सद्गती दाता. त्यांना आपले स्वतःचे शरीर तर नाही आहे. मग कोणामार्फत मत देतात? तुम्ही देखील आत्मा आहात, या शरीराद्वारे संवाद साधता ना. शरीरा शिवाय आत्मा काहीही करू शकत नाही. निराकार बाबा देखील कसे आले? गायन देखील आहे - रथावरून येतात. मग कोणी काय, कोणी काय बसून बनवले आहे. त्रिमूर्ती देखील सूक्ष्मवतनमध्ये दाखवला आहे. बाबा समजावून सांगतात - या सर्व आहेत साक्षात्काराच्या गोष्टी. बाकी रचना तर सारी इथेच आहे ना. तर रचता बाबांना देखील इथे यावे लागते. पतित दुनियेमध्येच येऊन पावन बनवायचे आहे. इथे मुलांना डायरेक्ट पावन बनवत आहेत. समजतात देखील तरीही ज्ञान बुद्धीमध्ये टिकत नाही. कोणाला समजावून सांगू शकत नाहीत. श्रीमताला पाळत नाहीत त्यामुळे श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनू शकत नाहीत. जे समजतच नाहीत ते काय पद मिळवतील. जितकी सेवा कराल तितके उच्च पद मिळवाल. बाबांनी सांगितले आहे - सेवेमध्ये हाडन् हाड द्यायचे आहे. ऑलराऊंड सेवा करायची आहे. बाबांच्या सेवेमध्ये आम्ही हाडे देखील द्यायला तयार आहोत. अनेक मुली सेवेसाठी तळमळत असतात - ‘बाबा, आम्हाला सोडवा म्हणजे आम्ही सेवेमध्ये लागू, ज्यामुळे अनेकांचे कल्याण होईल’. सारी दुनिया तर भौतिक सेवा करते. त्याने तर शिडी खालीच उतरत येतात. आता या रुहानी सेवेद्वारे चढती कला होते. प्रत्येकजण समजू शकतो - हा अमका आपल्यापेक्षा जास्त सेवा करत आहे. सेवाभावी चांगल्या मुली असतील, तर सेंटर देखील सांभाळू शकतील. वर्गामध्ये क्रमवारीने बसतात. इथे काही नंबरवार बसवत नाहीत, निराश होतील. समजू तर शकतात ना. सेवा करत नाहीत तर जरूर पद देखील कमी होईल. नंबरवार पदे पुष्कळ आहेत ना. परंतु ते आहे सुखधाम, हे आहे दुःखधाम. तिथे आजार इत्यादी काही होत नाहीत. बुद्धीने विचार करावा लागतो. समजले पाहिजे आपण तर खूप कमी पद मिळवणार कारण सेवा तर करत नाही. सेवेद्वारेच पद मिळू शकते. आपली तपासणी केली पाहिजे. प्रत्येकजण आपल्या अवस्थेला जाणतात. मम्मा-बाबा देखील सेवा करत आले आहेत. चांगली-चांगली मुले देखील आहेत. भले नोकरी देखील करतात, त्यांना सांगितले जाते - अर्ध पगारी सुट्टी घेऊन देखील जाऊन सेवा करा, काही हरकत नाही. जे बाबांच्या हृदयावर ते ताऊसी तख्तावर (मयूर सिंहासनावर) बसतात, नंबरवार पुरुषार्था नुसार. तसेच विजय माळेमध्ये येतात. समर्पण देखील होतात, सेवा देखील करतात. कोणी तर भले समर्पण होतात, परंतु सेवा करत नाहीत तर पद कमी होईल ना. ही राजधानी स्थापन होत आहे श्रीमतानुसार. असे कधी ऐकले आहे का? अथवा शिक्षणाने राज्य स्थापन होते, असे कधी ऐकले, कधी पाहिले आहे का? होय, दान-पुण्य केल्याने राजाच्या घरी जन्म घेऊ शकतात; बाकी शिक्षणाद्वारे राज्यपद मिळेल, असे तर कधी ऐकले नसेल. कोणाला माहिती देखील नाही. बाबा समजावून सांगतात - तुम्हीच पूर्ण ८४ जन्म घेतले आहेत. तुम्हाला आता वर जायचे आहे. खूप सोपे आहे. तुम्ही कल्प-कल्प नंबरवार पुरुषार्थानुसार समजता. बाबा प्रेमपूर्वक आठवण देखील नंबरवार पुरुषार्थानुसार देतात, जास्त प्रेमपूर्वक आठवण त्यांना देतील जे सेवेमध्ये आहेत. तर आपली तपासणी करायची आहे की, मी बाबांच्या हृदयामध्ये स्थान मिळवले आहे? माळेचा मणी बनू शकतो? अडाणी जरूर शिकलेल्या समोर सेवा करतील. बाबा तर समजावून सांगतात - मुलांनो, पुरुषार्थ करा, परंतु ड्रामामध्ये पार्ट नसेल तर मग कितीही डोके आपटा, पुढे जाणारच नाहीत. काही ना काही ग्रहचारी बसते. देह-अभिमानामुळेच मग इतर विकार येतात. मुख्य गंभीर आजार देह-अभिमानाचा आहे. सतयुगामध्ये देह-अभिमानाचे नावही नसेल. तिथे तर आहेच तुमचे प्रारब्ध. हे इथेच बाबा समजावून सांगतात. अजून कोणी असे श्रीमत देत नाही की, स्वतःला आत्मा समजून मामेकम् (मज एकाची) आठवण करा. ही मुख्य गोष्ट आहे. लिहिले पाहिजे - निराकार भगवान म्हणतात - ‘मज एकाची आठवण करा. स्वतःला आत्मा समजा. आपल्या देहाची देखील आठवण करू नका’. जसे भक्तीमध्ये देखील एका शिवाची पूजा करता. आता ज्ञान देखील फक्त मीच देतो. बाकी सर्व आहे भक्ती, अव्यभिचारी ज्ञान एका शिवबाबांकडूनच तुम्हाला मिळते. या ज्ञानसागरातून रत्ने निघतात. त्या सागराची गोष्ट नाहीये. हा ज्ञानाचा सागर तुम्हा मुलांना ज्ञानरत्न देत आहे, ज्याद्वारे तुम्ही देवता बनता. शास्त्रांमध्ये तर काय-काय लिहून ठेवले आहे. सागरातून देवता बाहेर आली मग तिने रत्ने दिली. हे ज्ञानसागर तुम्हा मुलांना रत्न देतात. तुम्ही ज्ञान रत्न टिपता (वेचता). पूर्वी दगड वेचत होता, तर पत्थर-बुद्धी बनलात. आता रत्न वेचल्याने तुम्ही पारस-बुद्धी बनता. पारसनाथ बनता ना. हे पारसनाथ (लक्ष्मी-नारायण) विश्वाचे मालक होते. भक्ती मार्गामध्ये तर अनेक नावे, अनेक चित्रे बनवून ठेवली आहेत. वास्तविक लक्ष्मी-नारायण अथवा पारसनाथ एकच आहेत. नेपाळमध्ये पशुपतीनाथची जत्रा भरते, ते देखील पारसनाथच आहेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांनी जी ज्ञान रत्ने दिली आहेत, ती टिपायची (वेचायची) आहेत, दगड नाही. देह-अभिमानाच्या गंभीर आजारापासून स्वत:ला वाचवायचे आहे.

२) आपल्या बॅटरीला पूर्ण चार्ज करण्यासाठी पॉवर हाऊस बाबांसोबत योग लावायचा आहे. आत्म-अभिमानी होऊन राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. निर्भय रहायचे आहे.

वरदान:-
‘दाता’पणाच्या भावनेद्वारे इच्छा मात्रम् अविद्या या स्थितीचा अनुभव करणारे तृप्त आत्मा भव

नेहमी एक लक्ष्य ठेवा की आम्हाला दात्याची मुले बनून सर्व आत्म्यांना द्यायचे आहे, ‘दाता’पणाची भावना ठेवल्यामुळे संपन्न आत्मा बनाल आणि जे संपन्न असतील ते सदैव तृप्त असतील. मी देणाऱ्या दात्याचा मुलगा आहे - देणे म्हणजेच घेणे आहे, हीच भावना नेहमी निर्विघ्न, इच्छा मात्रम् अविद्येच्या स्थितीचा अनुभव करविते. सदैव एका लक्ष्यावरच नजर रहावी, ते लक्ष्य आहे - बिंदू; बाकी कोणत्याही गोष्टींच्या विस्ताराकडे दिसत असून सुद्धा पाहू नका, ऐकत असताना सुद्धा ऐकू नका.

बोधवाक्य:-
बुध्दी किंवा स्थिती जर कमकुवत असेल तर याचे कारण आहे - व्यर्थ संकल्प.

अव्यक्त इशारे:- आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा.

कर्मातीत बनण्यासाठी कर्मांच्या हिशोबापासून मुक्त बना. सेवेमध्ये सुध्दा सेवेच्या बंधनामध्ये बांधले जाणारे सेवाधारी नाही. बंधन-मुक्त बनून सेवा करा अर्थात हदच्या रॉयल इच्छांपासून मुक्त बना. जसे देहाचे बंधन, देहाच्या नात्यांचे बंधन, तसेच सेवेमध्ये स्वार्थ - हे बंधन सुध्दा कर्मातीत बनण्यामध्ये विघ्न आणते. कर्मातीत बनणे अर्थात या रॉयल हिशोबापासून देखील मुक्त.