10-06-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - शिवबाबा आणि ब्रह्मा बाबा दोघांचे मत प्रसिद्ध आहे, तुम्ही दोघांच्याही मतानुसार चालून आपले कल्याण करायचे आहे”

प्रश्न:-
नंबर वन ट्रस्टी कोण आहेत आणि कसे?

उत्तर:-
शिवबाबा नंबर वन ट्रस्टी आहेत, त्यांच्यामध्ये अजिबात आसक्ती नाही. भक्तिमार्गामध्ये देखील तुम्ही त्यांच्या नावाने जे काही दान-पुण्य इत्यादी करता ते सर्व इन्शुअर होते (जमा होते), ज्याचे फळ दुसऱ्या जन्मात मिळते. आता देखील जे बाबांच्या नावाने आपले सर्व काही इन्शुअर करतात, त्याचे पूर्ण रिटर्न बाबा देतात; कारण बाबा म्हणतात - मी स्वतः काही सुख उपभोगत नाही. मी तुमचे घेऊन काय करणार?

गीत:-
दर पर आये हैं कसम ले…

ओम शांती।
गोड-गोड सिकीलध्या मुलांनी (खूप काळानंतर भेटलेल्या मुलांनी) गाणे ऐकले. मुले त्यांना म्हटले जाते जी बाबांची बनतात. बाबांनी समजावून सांगितले आहे - हा शेवटचा मरजीवा जन्म आहे. जिवंतपणी त्या पित्याचे बनायचे आहे. हे तर मुले जाणतात, श्रीमत प्रसिद्ध आहे. श्रीमत भगवानुवाच. गीतेमध्ये श्रीकृष्णाचे नाव टाकले आहे परंतु ते शिवबाबा आहेत. त्यांच्यानंतर ब्रह्मा, मग श्रीकृष्ण. श्रीमत श्रीकृष्णाचे असे म्हणत नाहीत. श्रेष्ठ ते श्रेष्ठ आमचे शिवबाबा आहेत. पतित-पावन, श्रीकृष्ण किंवा राधा इत्यादींना म्हणत नाहीत. ते दैवी गुण असलेले मनुष्य आहेत. मनुष्याला पतित-पावन म्हटले जात नाही. सतयुगामध्ये असे म्हणणार नाही की, ‘पतित-पावन या’. पतितांना पावन बनविणारे एक बाबाच आहेत, ज्यांच्या श्रीमतावर तुम्ही चालत आहात. प्रजापिता ब्रह्माचे मत देखील प्रसिद्ध आहे. श्रीमत देखील प्रसिद्ध आहे. शिवबाबा येऊन तुम्हाला आपले बनवतात. म्हणतात - शिर तळहातावर घेऊन बाबांचे बनलो आहोत. त्यांच्या डायरेक्शन प्रमाणे चालावे लागेल. तुम्ही बाबांना आपले मत (सल्ला) देण्याची आवश्यकता नसते. ते स्वतः मत देणारे आहेत. ही तर सर्व मुले आहेत. शिवबाबा नामीग्रामी आहेत. ते जे मत देतील, जे काही करतील, ते राईट (योग्यच) असेल. या ब्रह्माला देखील मत देतात की असे करा. तुमचे कनेक्शनच शिवबाबांशी आहे. कोणाचेही अवगुण बघायचे नाहीत, श्रीमतावर चालायचे आहे. शिवबाबा तर आहेत निराकार. हे काही त्यांचे घर तर नाहीये. तुम्ही इथे जुन्या घरात राहता नंतर मग स्वर्गात जाऊन आपल्या घरात राहतील. शिवबाबा म्हणतात मी तर राहणार नाही. मी तर यावेळी थोड्या काळासाठी येतो.

तुम्ही आहात खरी-खरी रुहानी सॅल्व्हेशन आर्मी (आत्मिक मुक्ती सेना). हुबेहूब ड्रामा प्लॅन अनुसार कल्पापूर्वीप्रमाणे सुप्रीम रूह (परम-आत्मा) डायरेक्शन देत आहेत. कल्प-कल्प जे डायरेक्शन देत असतील तेच देत आहेत. रात्रं-दिवस गूढ गोष्टी ऐकवत राहतात. नवीन आलेला कोणी हे समजू शकणार नाही. भले कोणी ३५-४० वर्षांपासून राहतात परंतु बरेचजण असे आहेत ज्यांना या गंभीर गोष्टी समजत नाहीत. बाबा तर दररोज नवीन गोष्टी ऐकवत राहतात. कराची पासून मुरली सुरु झाली आहे. अगोदर बाबा मुरली चालवत नव्हते. रात्री २ वाजता उठून १०-१५ पाने लिहीत होते. बाबा लिहून घेत होते, मग त्यांच्या कॉप्या काढल्या जात होत्या. भक्तिमार्गामध्ये तर शास्त्र इत्यादींचे कागद सांभाळतात. दिवसें-दिवस मोठी-मोठी पुस्तके बनवत येत आहेत. कित्येक बायोग्राफी (जीवन चरित्रे) बनवत जातात. ती मग वाचून ठेवून देतात. तुम्ही तर मुरली वाचून फेकून देता. नाही तर ही महावाक्ये कायमची जपून ठेवली पाहिजेत. परंतु नाही, कारण तुम्ही जाणता की हे सर्व नष्ट होणार आहे. चित्रे इत्यादी जे काही तुम्ही बनवता ती थोड्या काळासाठी आहेत. नंतर मग ही गाडली जातील, तिथे (सतयुगामध्ये) मग ना शास्त्रे, ना चित्रे इत्यादी काहीही राहत नाहीत; मग हे जे काही चालले आहे, ते कल्पानंतर देखील पुन्हा होईल. शास्त्रे इत्यादी पुन्हा द्वापरपासून सुरू होतील. ग्रंथ देखील पूर्वी तर हाताने लिहिलेला खूप छोटा होता. आता मोठा बनवला आहे. दिन-प्रतिदिन मोठा बनवत जातील. नाही तर शिवबाबांची जीवन कहाणी किती लिहायला पाहिजे! आता तुम्ही मुले म्हणता - परमपिता परमात्म्याची जीवन कहाणी आम्ही जाणतो. बाबा बसून समजावून सांगतात - मी भक्तिमार्गामध्ये काय करतो. भक्तिमार्गामध्ये देखील इन्शुरन्स करतो. ईश्वराच्या नावाने मनुष्य दान-पुण्य करतात ना. म्हणतात - याने ईश्वराच्या नावाने खूप दान-पुण्य केले आहे, म्हणून ईश्वराने मोठ्या घरी जन्म दिला आहे. भक्तिमार्गामध्ये धर्मात्मा खूप असतात. ईश्वराच्या नावाने, श्रीकृष्णाच्या नावाने दान-पुण्य करतात. तर मग बाबा समजावून सांगतात - मी मुलांना दुसऱ्या जन्मामध्ये अल्पकाळासाठी फळ देत आलो आहे. चांगले अथवा वाईट फळ तर मिळते ना. किती इन्शुरन्स झाला! जे जसे कर्म करतात, त्यानुसार फळ मिळते. माया उलटे काम करायला लावते, ज्यामुळे तुम्हाला दुःख प्राप्त होते. आता मी तुम्हाला अशी कर्म शिकवतो की कधीही दुःख होणार नाही आणि तिथे माया देखील नसते. बाकी आहे पद, जो जितके इन्शुअर करेल. शिवबाबा देखील ट्रस्टी आहेत ना. नंबरवन ट्रस्टी आहेत. दुसऱ्या कोणाचीही आसक्ती जाईल, काही ट्रस्टी तर एखाद्याचे जीवनच बरबाद करतात. बाबा तर बघा कसे ट्रस्टी आहेत, म्हणतात - हे सर्व काही मुलांसाठी आहे. तुमचे सर्व कनेक्शन शिवबाबांशी आहे. बाबा म्हणतात - मी सच्चा ट्रस्टी आहे. मी स्वतः सुखाचा उपभोग घेत नाही मुलांना पूर्ण राज्य देतो. लौकिक पिता देखील मुलांना सर्व काही वारशामध्ये देऊन जातात. मी तर स्वर्गात काहीच घेत नाही. तुम्हालाच सर्व देतो. तर तुमचे सर्व कनेक्शन शिवबाबांशी आहे. हे बाबा (ब्रह्मा बाबा) म्हणतात - ‘मी देखील संपूर्ण इन्शुअर केले आहे. तन-मन-धन सर्व काही बाबांच्या सेवेमध्ये आहे’. सिंधीत एक म्हण आहे - हाथ जिसका ऐसे, पहिला पूर वह पहुंचेंगे (ज्याचा हात दात्याच्या रूपामध्ये असतो तो पहिल्या नंबर वर पोहोचतो). सर्व काही बाबांना इन्शुअर करायचे आहे. दोन मुठी तांदूळ दिले तर महाल मिळाले! आता बघा घर बनले आहे. कोणी एक रुपया पाठवला, आमची वीट देखील लागू दे. बाबांनी लिहिले - ‘तुम्हाला तर सर्वात चांगले महाल मिळतील कारण तुम्ही गरीब आहात’. मी आहेच गरीब निवाज. गरीबाचा एक रुपया तर श्रीमंताचे दहा हजार, दोघांना एकच पद मिळते. श्रीमंत फार मुश्किलीने येतात. सर्वात कन्या तर पूर्णपणे मोकळ्या आहेत. बघा नंबरवन मम्मा गेली. तिच्याकडे तर काहीही नव्हते. गरीब घरातली मुलगी होती तरीही नंबरवनमध्ये गेली. याने (ब्रह्मा बाबांनी) सर्व काही दिले तरी देखील पहिली लक्ष्मी मग नारायण. किती आश्चर्यकारक खेळ आहे. तर कधीही कोणत्या बाबतीत संशय येता कामा नये. बापदादा काही कमी थोडेच आहेत? यांच्या बाबतीत जरा सुद्धा संशय उत्पन्न होता कामा नये. खूप गोड देखील बनायचे आहे. पावलो-पावली श्रीमत घ्यायचे आहे, नाही तर माया खूप नुकसान करू शकते. मुलांना किती डायरेक्शन्स द्याव्या लागतात. बाबा म्हणतात - पूर्ण समाचार लिहा. बाबा सर्व गोष्टींची काळजी घेतील. बाबांना फार काळजी असते. हा मुलगा कुठे भरकटू नये. अभ्यासावर पूर्ण लक्ष पाहिजे. आपण आहोत मोस्ट बिलवेड गॉड फादरली स्टुडंट (अतिप्रिय ईश्वरीय विद्यार्थी). भगवानुवाच देखील लिहिलेले आहे परंतु श्रीकृष्णाचे नाव टाकले आहे. श्रीकृष्ण देखील सर्व मनुष्यांपेक्षा उच्च ते उच्च आहेत ना. फर्स्ट प्रिन्स (प्रथम राजकुमार) आहे. श्रीकृष्णाचे नाव देतात, श्री नारायणाचे का नाही! श्रीकृष्ण बालक आहे. छोटेपणी बालक सतोप्रधान असते. मग बाल्यावस्थे नंतर युवा, नंतर वृद्धावस्था येते. छोट्या मुलांचीच महिमा करतात, कारण पवित्र आहेत ना. बालक ब्रह्मज्ञानी समान म्हणतात. बालकांकडून कोणतेही पाप होत नाही. तर श्रीकृष्ण देखील छोटा बालक असल्यामुळे त्याचा वाढदिवस साजरा करतात. तरीही श्रीकृष्णाला द्वापरमध्ये दाखवले आहे. हे सर्व बाबा बसून समजावून सांगत आहेत. दुनियेमध्ये तुम्हा ब्राह्मणांशिवाय असा कोणीही नसेल ज्याला या सर्व गोष्टी माहीत आहेत. ब्राह्मण आहेत उत्तम. तुम्ही ब्राह्मण आहात - ईश्वरीय संतान. सतयुगामध्ये ‘ईश्वरीय संतान’ म्हणणार नाही. ईश्वराकडून जरूर स्वर्गाची प्राप्ती होईल. हे आहे तुमचे अति दुर्लभ अमूल्य जीवन. सर्वांचे तर असू शकत नाही. हा ड्रामा असा बनलेला आहे. कल्पापूर्वी ज्यांनी अभ्यास केला, ते शिकत आहेत. भगवंताने जरूर भगवान-भगवती निर्माण केले आहेत; परंतु त्यांना भगवान-भगवती म्हणू शकत नाही. गॉड इज वन (ईश्वर एक आहे). निराकाराची महिमा आहे. साकारची थोडीच महिमा असते! या लक्ष्मी-नारायणाला निराकाराने असे घडवले आहे. आता राजयोग शिकत आहेत. राज्य स्थापन झाले, तर त्यावेळी विनाश देखील झाला. बाबा जरूर स्वर्गाचा वारसा देतील. आता तर आहे संगमयुगाची गोष्ट. शिवबाबा येतात तेव्हा खेळ पूर्ण होतो, आणि मग श्रीकृष्णाचा जन्म होतो. मनुष्य तर बिचारे गोंधळलेले आहेत, म्हणून तर बाबा येऊन समजावून सांगतात. परमपिता परमात्मा, ब्रह्मा द्वारे सर्व शास्त्रांचे सार सांगतात. आता तुम्ही जणू मास्टर नॉलेजफुल बनले आहात. आत्म्याचीच महिमा आहे. ज्ञानाचा सागर, आनंदाचा सागर, ब्लिसफुल ही सर्व बाबांची महिमा आहे. बाबा म्हणतात - हा भारत तर सर्वात मोठे तीर्थस्थान आहे. परंतु श्रीकृष्णाचे नाव टाकल्यामुळे सर्व महिमा नष्ट झाली आहे. नाहीतर सर्व जण शिवाच्या मंदिरामध्ये फुले वाहतात, सर्वांचे सद्गती दाता ते एक आहेत. अर्धे कल्प तुम्ही प्रारब्ध उपभोगून मग खाली येता. सर्वांना तमोप्रधान बनायचेच आहे. आता बाबा म्हणतात - तुम्हा मुलांसाठी मी नवीन दुनिया स्थापन करत आहे. तिथे मी स्वतः येत नाही, सर्व काही तुम्हा मुलांसाठी आहे. स्वच्छ गोष्ट आहे. मनुष्य तर आपल्यासाठी करतात, मग म्हणतात की, आम्ही निष्काम कर्म करतो; परंतु निष्काम तर कोणी करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीचे फळ जरूर मिळते. मी तर तुम्हा मुलांना अविनाशी ज्ञान-रत्ने देतो. तुमच्यासाठीच वैकुंठ आणला आहे. मुलांना साम्राज्याची अमूल्य भेट देतो. तर ते घेण्यासाठी तसे लायक बनले पाहिजे. स्वर्गाचा मालक बनायचे आहे. तळहातावर स्वर्ग मिळत आहे. सेकंदामध्ये जीवनमुक्ती अथवा सेकंदामध्ये बादशाही. दिव्यदृष्टी-दाता शिवबाबा आहेत. सेकंदामध्ये वैकुंठामध्ये घेऊन जातात, या बाबांच्या (ब्रह्मा बाबांच्या) हातात अजिबात चावी नाहीये. बाबा म्हणतात - मी तुम्हा मुलांना राज्य देतो, मी राज्य करत नाही. मग तुम्ही जेव्हा भक्तिमार्गात जाल तेव्हा तुमचे दिव्यदृष्टीद्वारे मनोरंजन करावे लागेल. किती चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. असे बाबा कल्प-कल्प, कल्पाच्या संगमयुगावर एकदाच येतात. ‘बनी बनाई बन रही, अब कुछ बननी नाही…’ जे काही घडते ते ड्रामामध्ये नोंदलेले आहे. त्याला साक्षी होऊन बघा. बाबा खूप चांगल्या रीतीने समजावून सांगतात. मुलांनो, मी तुमचे इन्शुरन्स मॅग्नेट आहे. तुमचा एक पैसा देखील वाया घालवत नाही. तुम्हाला कवडी पासून हिरेतुल्य बनवतो. हे सर्व शिवबाबा यांच्याद्वारे करतात, करनकरावनहार आहेत. निराकार, निरहंकारी ते आहेत. गॉडफादर कसे बसून शिकवत आहेत. असे म्हणत नाहीत की माझ्या चरणावर लोटांगण घाला. बाबा ओबीडीयंट सर्व्हेंट (आज्ञाधारक सेवक) आहेत. बाबा म्हणतात - ज्यांना मालक बनवले ते सुख उपभोगल्या नंतर आता दुःखी झाले आहेत. सुख देखील खूप मिळते. इतके सुख कोणत्याही धर्माला मिळत नाही. असे कोणी म्हणू शकत नाही की, भारतवासियांनाच का, बाकीच्यांनी काय केले आहे? अरे इतके असंख्य मनुष्य आहेत, सर्वच काही येऊ शकत नाहीत. हा ड्रामा बनलेला आहे. भारतातच आदि सनातन देवी-देवता धर्म होता. भगवंताने येऊन सहज राजयोग शिकवला होता. बाबा म्हणतात - मी पुन्हा आलेलो आहे. तुम्ही देखील जाणता ८४ जन्मांचा पार्ट बजावला, आता पुन्हा आम्ही घरी जात आहोत. हे खूप जुने वस्त्र झाले आहे (सापाचे उदाहरण आहे). संन्यासी लोक मग म्हणतात - आत्मा सो परमात्म्यामध्ये लीन होते, अशा अवस्थेमध्ये राहता-राहता मग शरीर सोडतात. परंतु ब्रह्ममध्ये कोणीही लीन होत नाही. त्यांच्यामध्ये देखील काही जण खूप हुशार असतात. शांतीमध्ये बसून शरीर सोडून निघून जातात, त्यामुळे त्याच्या वायुमंडळामध्ये २-३ दिवस नीरव शांतता पसरते. तर तुम्ही जाणता की हे जुने शरीर सोडून बाबांकडे जायचे आहे. ब्रह्म म्हणजे काही बाबा नव्हेत, हा त्या बिचाऱ्यांचा भ्रम आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या ड्रामाचा प्रत्येक सीन साक्षी होऊन बघायचा आहे, कारण ‘बनी बनाई बन रही’. कधीही कोणत्या बाबतीत संशय उत्पन्न होऊ द्यायचा नाही.

२) बाबा इन्शुरन्स मॅग्नेट आहेत, म्हणून तन-मन-धन बाबांच्या सेवेमध्ये सफल करून आपले भविष्य बनवायचे आहे. पूर्णतः बाबांसोबत कनेक्शन ठेवायचे आहे, पूर्ण समाचार द्यायचा आहे.

वरदान:-
मरजीवा स्थिती द्वारे हिंमत आणि उत्साहाचा अविनाशी स्टॅम्प लावणारे प्राप्ती संपन्न भव

जे प्राप्तींनी संपन्न असतात त्यांच्या प्रत्येक व्यवहारामधून, डोळ्यांमधून आणि कृतीमधून, उमंग-उत्साह दिसून येतो. परंतु हिंमत आणि उत्साहाचा अविनाशी स्टॅम्प लावण्यासाठी आपले पूर्वीचे अथवा ईश्वरीय मर्यादांच्या विपरीत जे संस्कार, स्वभाव, संकल्प अथवा कर्म होतात त्यांच्यापासून मरजीवा बना. प्रतिज्ञा रुपी स्विच सेट करून प्रत्यक्षात प्रतिज्ञेप्रमाणे चालत रहा. हिंमती सोबतच उत्साह असेल तर प्राप्तीची झलक दुरूनच दिसून येईल.

बोधवाक्य:-
जत्रेमध्ये (गर्दीमध्ये) अथवा गडबडगोंधळामध्ये डबल लाईट राहणारेच धारणामूर्त आहेत.

हे अव्यक्त इशारे - सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.

तुमच्या प्रत्येक संकल्प, प्रत्येक शब्दामध्ये विशेषता असावी. नेहमी सरळ स्वभाव, सरळ बोलणे, साधेपणाने संपन्न असे कर्म असावे, असे सरळपणाने रहा. सदैव एकाच्या मतानुसार, एकाशी सर्व नाती, एकाकडूनच सर्व प्राप्ती असे एकाद्वारे सदैव एकरस राहण्याचे सहज अभ्यासी बना. नेहमी आनंदी रहा, आनंदाचा खजिना वाटा. आनंदाची लाट सर्वांमध्ये पसरवा, हीच खरी सेवा आहे.