12-08-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, आठवणीमध्ये राहिल्याने चांगली दशा बसते, आता तुमच्यावर बृहस्पतीची दशा आहे, म्हणून तुमची चढती कला आहे”

प्रश्न:-
‘योग’ लावण्यावर जर पूर्ण अटेन्शन नसेल तर त्याचा परिणाम काय होतो? निरंतर आठवणीमध्ये राहण्याच्या युक्त्या कोणत्या आहेत?

उत्तर:-
१) योग लावण्यावर जर पूर्ण अटेन्शन नसेल तर चालता-चालता मायेची प्रवेशता होते, खाली कोसळतात (अधोगती होते). २) देह-अभिमानी बनून अनेक चुका करत राहतात. माया उलटी कर्म करवून घेत राहते. पतित बनवते. निरंतर आठवणीमध्ये राहण्यासाठी मुखामध्ये मोहर टाका, क्रोध करू नका, देहा सहित सर्व काही विसरून, ‘मी आत्मा, परमात्म्याची संतान आहे’ - असा अभ्यास करा. योगबलाने कोणकोणत्या प्राप्ती होतात, त्या स्मृतीमध्ये ठेवा.

गीत:-
ओम् नमो शिवाय...

ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांनी आपले रुहानी पिता, शिवबाबांची महिमा ऐकली. जेव्हा पाप वाढते अर्थात मनुष्य पाप-आत्मे बनतात, तेव्हाच पतित-पावन बाबा येतात, येऊन पतितांना पावन बनवतात. त्या बेहदच्या बाबांचीच महिमा आहे, त्यांना वृक्षपती देखील म्हटले जाते. या वेळी बेहदच्या बाबांद्वारे बेहदची बृहस्पतीची दशा तुमच्या वर बसलेली आहे. ‘खास’ आणि ‘आम’ हे दोन शब्द आहेत ना. त्यांचा अर्थ देखील इथेच सिद्ध होतो. बृहस्पतीच्या दशेमुळे खास भारत जीवनमुक्त बनतो अर्थात आपले स्वराज्य पद प्राप्त करतात; कारण सत्य बाबा जे आहेत, ज्यांना ‘ट्रुथ’ म्हटले जाते, ते येऊन आम्हाला नरा पासून नारायण बनवतात. बाकी जे इतर धर्मांचे आहेत ते नंबरवार आपापल्या धर्माच्या सेक्शनमध्ये जाऊन बसतील आणि येतील देखील नंबरवार. कलियुगाच्या अंतापर्यंत येत राहतात. प्रत्येक आत्म्याला आपापल्या धर्मामध्ये आपापला पार्ट मिळालेला आहे. राज्यामध्ये राजा पासून प्रजे पर्यंत सर्वांना आपापला पार्ट मिळालेला आहे. नाटक आहे देखील राजा पासून प्रजेपर्यंत. सर्वांना आपापला पार्ट बजावायचा असतो. आता मुले जाणतात की, आपल्यावर बृहस्पतीची दशा बसलेली आहे. असे नाही की, फक्त एका दिवसासाठी बसते. नाही, तुमची बृहस्पतीची दशा चालू आहे. आता तुमची चढती कला आहे. जितकी आठवण कराल, तितकी चढती कला होईल. आठवण विसरल्याने मायेची विघ्ने येतात. आठवणीमुळे चांगली दशा बसते. चांगल्या रीतीने आठवण केली नाही, तर जरूर खालीच कोसळणार (पतनच होईल). मग त्यांच्याकडून काही ना काही चुका होतील. बाबांनी समजावून सांगितले आहे की, ड्रामा अनुसार सर्व धर्मांचे जे कोणी आहेत ते एका मागून एक पार्ट बजावण्याकरिता येतात. मुले जाणतात की, आता आपल्यावर स्वर्गाची दशा अर्थात जीवनमुक्तीची दशा बसलेली आहे. या ड्रामाचे चक्र कसे फिरते, हे देखील सविस्तरपणे समजून घ्यायचे आहे. हे सृष्टी-ड्रामाचे चक्र खास भारतावर आधारित बनलेले आहे. बाबा देखील भारतामध्येच येतात. गायले गेले आहे - आश्चर्यवत सुनन्ती, कथन्ती, भागन्ती… चालता-चालता मायेची प्रवेशता झाल्या कारणाने कोसळतात (अधोगती होते). योग लावण्यावर नीट लक्ष देत नाहीत, मग बाबा येऊन संजीवनी बुटी देतात अर्थात पुन्हा जिवंत करणारी बुटी देतात. हनुमान देखील तुम्हीच आहात. बाबांनी सांगितले आहे की, या वेळी रावणाला पळवून लावण्यासाठी मी ही बुटी हुंगायला देतो.

बाबा तुम्हाला सर्व सत्य गोष्टी सांगत आहेत. सत्य आहेतच एक बाबा, जे येऊन तुम्हाला सत्यनारायणाची कथा ऐकवून सतयुगाची स्थापना करतात. त्यांना म्हटलेच जाते - ट्रुथ, सत्य सांगणारे. दुनियावाले तुम्हाला विचारतात - ‘तुम्ही शास्त्रांना मानता का?’ तुम्ही बोला - होय, आम्ही शास्त्रांना का नाही मानत? कारण आम्ही जाणतो की, ही सर्व भक्तिमार्गाची शास्त्रे आहेत. हे तर आम्ही मानतो की, ज्ञान आणि भक्ती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा ज्ञान मिळते, तेव्हा मग भक्तीची काय आवश्यकता आहे? भक्ती अर्थात उतरती कला. ज्ञान अर्थात चढती कला. या वेळी भक्ती चालू आहे. आता आपल्याला ज्ञान मिळाले आहे, ज्याद्वारे सद्गती होते. भक्तांचे रक्षण करणारे एक भगवानच आहेत. रक्षण शत्रू पासून केले जाते ना. बाबा म्हणतात, मी येऊन तुमचे रावणापासून रक्षण करतो. तुम्ही पाहता ना, रावणा पासून कसे रक्षण होत आहे. या रावणावर विजय प्राप्त करायचा आहे. बाबा समजावून सांगत आहेत - गोड मुलांनो, या रावणाने तुम्हाला तमोप्रधान बनवले आहे. सतयुगाला म्हटले जाते सतोप्रधान, स्वर्ग. नंतर मग कला कमी होत जातात. शेवटी जेव्हा पूर्णपणे देह-अभिमानामध्ये येतात, तेव्हा पतित बनतात. नवीन घर बांधले की एक महिन्या नंतर किंवा सहा महिन्या नंतर त्याची थोडीफार तरी कला कमी होतेच. प्रत्येक वर्षी घराला रंगरंगोटी करतात. कला तर कमी होत जातेच ना. नव्या पासून जुनी आणि जुन्या पासून पुन्हा नवीन, सुरुवाती पासून प्रत्येक वस्तूच्या बाबतीत असेच होत आले आहे. समजले जाते की, हे घर शंभर किंवा दीडशे वर्षे चालेल. बाबा समजावून सांगत आहेत - सतयुगाला म्हटले जाते नवीन दुनिया. त्यानंतर त्रेता २५ टक्के कमी म्हणता येईल, कारण थोडे जुने होते. ते आहेत चंद्रवंशी. त्यांची निशाणी दाखवतात - क्षत्रिय, कारण नवीन दुनियेच्या लायक बनले नाहीत, म्हणून पद कमी झाले. सर्वांना वाटते कृष्णपुरी मध्ये जावे. असे थोडेच कधी म्हणतात की, रामपुरी मध्ये जावे. सर्व जण कृष्णपुरी विषयीच म्हणतात. गातात देखील ना - ‘चलो वृंदावन भजो राधे-गोविंद…’ ही वृंदावनची गोष्ट आहे. अयोध्ये विषयी असे म्हणणार नाहीत. सर्वांचे श्रीकृष्णावर खूप प्रेम असते. श्रीकृष्णाची खूप प्रेमाने आठवण करतात. श्रीकृष्णाला पाहून म्हणतात - यांच्या सारखा पती मिळावा, यांच्या सारखा मुलगा मिळावा, यांच्या सारखा भाऊ मिळावा. हुशार मुलगे किंवा मुली ज्या असतात त्या श्रीकृष्णाची मूर्ती समोर ठेवतात की, यांच्यासारखा मुलगा मिळावा. श्रीकृष्णाच्या प्रेमामध्ये खूप लवलीन असतात ना. सर्वांना कृष्णपुरी हवी आहे. आता तर कंसपुरी, रावणाची पुरी आहे. कृष्णपुरीचे खूप महत्त्व आहे. सर्व जण श्रीकृष्णाची आठवण करतात. म्हणूनच बाबा म्हणतात - तुम्ही इतका काळ आठवण करत आला आहात. आता कृष्णपुरी मध्ये जाण्याचा पुरुषार्थ करा, याच्या (श्रीकृष्णाच्या) घराण्यामध्ये तरी जा. सूर्यवंशींची ८ घराणी आहेत तर इतका पुरुषार्थ करा की, जेणेकरून राज्यामध्ये येऊन राजकुमारासोबत झोके घ्याल. ही समजून घेण्याची गोष्ट आहे ना.

बाबा म्हणतात - ‘मुलांनो, जितके शक्य होईल तितके मनमनाभव रहा. आठवणीमध्ये न राहिल्यामुळे कोसळतात (पतन होते). ज्ञान कधीही तुम्हाला खाली पाडत नाही (अधोगती करत नाही). आठवणीमध्ये राहत नाहीत, म्हणून कोसळतात. यावरच अल्लाह अवलदीन, हातमताईची नाटके देखील बनलेली आहेत. आठवणीमध्ये राहण्यासाठीच मुखामध्ये मोहर घालत असत. कोणाला क्रोध येतो तेव्हा वाट्टेल ते बोलतात, म्हणून म्हणतात - मुखामध्ये काही तरी घाला. बोलूच नका म्हणजे मग क्रोध येणार नाही. बाबा म्हणतात - कधीही कोणावर क्रोध करू नका. परंतु या गोष्टींना नीटपणे समजून न घेतल्यामुळे शास्त्रांमध्ये काहीच्या काही लिहून ठेवले आहे. बाबा बसून यथार्थ रीतीने समजावून सांगत आहेत. बाबा जेव्हा येतील, तेव्हाच तर येऊन समजावून सांगतील. जे होऊन जातात, त्यांची महिमा गायली जाते. टागोर, झाशीची राणी होऊन गेले, त्यांच्यावर नंतर नाटक बनवतात. अच्छा, ‘शिव’ देखील होऊन गेले आहेत, तेव्हाच तर शिव जयंती साजरी करतात ना. परंतु शिव कधी आले, येऊन काय केले, हेच ठाऊक नाहीये. ते तर साऱ्या सृष्टीचे पिता आहेत. जरूर येऊन सर्वांना सद्गती दिली असेल. इस्लामी, बौद्ध इत्यादी जे कोणी धर्मांची स्थापना करून गेले आहेत, त्यांची जयंती साजरी करतात. तिथी-तारीख सर्वांची आहे, परंतु यांच्या विषयी (शिवबाबां विषयी) मात्र कोणालाच माहीत नाही. म्हणतात देखील, क्राइस्टच्या इतक्या वर्षांपूर्वी भारत पॅराडाईज होता. स्वस्तिक जेव्हा बनवतात, तेव्हा त्याचे पूर्ण ४ भाग करतात. ४ युगे आहेत. त्यांचा कालावधी कमी-जास्त होऊ शकत नाही. जगन्नाथपुरी मध्ये तांदळाचा हंडा शिजवतात. त्याचे पूर्ण चार भाग होतात. बाबा म्हणतात - भक्तिमार्गामध्ये हे सर्व अगडम-बगडम करून ठेवले आहे. आता बाबा म्हणतात - देहा सहित हे सर्व विसरून जा. ‘मी आत्मा आहे, परमपिता परमात्म्याची संतान आहे’, हा अभ्यास करत रहा. बाबा स्वर्गाचे रचयिता आहेत, तर जरूर आम्हाला स्वर्गामध्ये पाठवले असेल. नरकामध्ये तर पाठवणार नाहीत. बाबा कोणालाही नरकामध्ये पाठवत नाहीत. अगदी सुरुवातीला सर्व जण सुख उपभोगतात. आत्मा अगोदर सुख आणि नंतर दुःख बघते. बाबा तर सर्वांचे दुःख हर्ता, सुख कर्ता आहेत ना. आत्मा अगोदर सुख आणि नंतर दुःख पाहते. विवेक देखील सांगतो - आपण प्रथम सतोप्रधान असतो, नंतर सतो, रजो, तमोमध्ये येतो. मनुष्य देखील समजतात की, परदेशातील लोक खूप हुशार आहेत. तिथे तर असे बॉम्ब्स बनवतात की, एका क्षणात सर्व खलास होतील. जसे आजकाल प्रेताला विजेवर क्षणात नष्ट करतात, तसे बॉम्ब टाकल्याने आग लागते तर मनुष्य देखील क्षणात नष्ट होतील. भंभोरला (जुन्या दुनियेला) आग लागणार आहे. वादळे अशी येतात की, गावेच्या गावे नष्ट होतात. मग त्या वेळी वाचविण्यासाठी कोणतीही व्यवस्था राहत नाही. विनाश तर होणारच आहे. जुनी दुनिया नष्ट होणार आहे. गीतेमध्ये देखील याचे वर्णन आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे - युरोपवासी असे बॉम्ब टाकतील की, काही कळणार सुद्धा नाही. तुम्ही मुले जाणता की, कल्पापूर्वी देखील विनाश झाला होता आणि आता देखील होणार आहे. तुम्ही देखील कल्पापूर्वी प्रमाणे शिकत आहात. हळूहळू झाडाची वृद्धी होत राहील. वृद्धी होत-होत नंतर मग स्थापना होते. मायेची वादळे चांगल्या-चांगल्या फुलांना देखील पाडून टाकतात. पूर्णत: ‘योग’ मध्ये राहत नाहीत, तर मग माया विघ्ने आणते.

बाबांचा बच्चा बनून पवित्रतेची प्रतिज्ञा करून मग पुन्हा जर विकारामध्ये पडले, तर नाव बदनाम करतील. मग खूप जोराचा धक्का बसतो. बाबा म्हणतात - हा कामविकाराचा फटका कधीही खाऊ नका. मुले जाणतात की, इथे रक्ताच्या नद्या वाहणार आहेत. सतयुगामध्ये दुधाच्या नद्या वाहतात. ती आहे नवीन दुनिया, ही आहे जुनी दुनिया. कलियुगामध्ये पहा काय आहे आणि नवीन दुनियेतील वैभव तर पहा. इथे तर काहीही नाही. मुली साक्षात्कारामध्ये जाऊन पाहून येतात. सूक्ष्मवतन मध्ये शुबीरस प्यायले, असे केले, ते सर्व साक्षात्कार होतात. म्हणतात - आम्ही मूलवतनमध्ये जातो. बाबा वैकुंठा मध्ये पाठवतात. हे सर्व साक्षात्कार इत्यादीची ड्रामामध्ये नोंद आहे, परंतु हे साक्षात्कार करून काहीही मिळत नाही. अनेक मुली सूक्ष्मवतन मध्ये जात होत्या, शुबीरस इत्यादी पीत असत. आणि आज त्या इथे नाहीत. चांगली-चांगली फर्स्टक्लास मुले नाहीशी झाली. बऱ्याच ध्यान-साक्षात्कारामध्ये जाणाऱ्यांनी नंतर विवाह केले. आश्चर्य वाटते - माया कशी आहे! भाग्य कसे उलटे फिरते! अनेकांनी चांगले-चांगले पार्ट बजावले. गरजेच्या काळामध्ये खूप मदत देखील केली, तरी देखील आज नाहीत. म्हणून बाबा म्हणतात - ‘माया, तू खूप बलवान आहेस’. तुमचे माये सोबत युद्ध चालते. याला म्हटले जाते योगबलाचे युद्ध. योगबलाद्वारे काय प्राप्ती होते, हे कुणालाच ठाऊक नाहीये. फक्त म्हणतात ‘भारताचा प्राचीन योग’. गोड-गोड मुलांना योग विषयी समजावून सांगितले जाते - प्राचीन राजयोग गायला गेला आहे. जे कोणी फिलॉसॉफर (तत्वज्ञानी) इत्यादी आहेत, त्यांना हे स्पिरिच्युअल नॉलेज (अध्यात्मिक ज्ञान) नाही. रुहानी बाबाच ज्ञानाचा सागर आहेत. त्यांच्या साठीच ‘शिवाय नमः’ असे गातात. त्यांचीच महिमा गायली आहे. बाबा येऊन तुम्हाला किती ज्ञान समजावून सांगतात. याला ज्ञानाचा तिसरा नेत्र म्हटले जाते; इतर कोणातही ताकद नाही जे स्वतःला त्रिकालदर्शी म्हणू शकतील. त्रिकालदर्शी फक्त ब्राह्मणच असतात, ज्या ब्राह्मणांद्वारे यज्ञ रचला आहे. हा रुद्र ज्ञान यज्ञ आहे ना. ‘शिव’ला देखील ‘रुद्र’ म्हटले जाते. अनेक नावे दिली आहेत. प्रत्येक देशामध्ये वेगवेगळी नावे भरपूर आहेत. एका बाबांशिवाय इतर कोणाचीही इतकी नावे नाहीत. बबुल-नाथ देखील यांनाच म्हणतात. बबुल त्यांना म्हटले जाते, ज्यांच्यामध्ये काटे असतात. बाबा काट्यांना फूल बनविणारे आहेत, म्हणून त्यांचे नाव ‘बबुलनाथ’ ठेवले आहे. मुंबईमध्ये तिथे खूप मोठी जत्रा भरते. अर्थ काहीच समजत नाहीत. बाबा बसून समजावून सांगतात - त्यांचे खरे नाव आहे - ‘शिव’. व्यापारी लोक देखील बिंदूला शिव म्हणतात. जेव्हा एक-दोन असे मोजतात आणि दहावर येतात, तेव्हा ‘शिव’ म्हणतात. बाबा देखील म्हणतात - ‘मी बिंदू, एक स्टार आहे’. अनेक लोक असा डबल टिळा देखील लावतात; माता आणि पिता. ज्ञान-सूर्य आणि ज्ञान-चंद्र यांचे प्रतीक आहे. ते (दुनियावाले) अर्थ जाणत नाहीत. तर बाबा ‘योग’ विषयी समजावून सांगत होते. योग किती प्रसिद्ध आहे. आता तुम्ही मुलांनी ‘योग’ शब्द सोडून द्या आणि आठवण करा. बाबा म्हणतात - ‘योग’ शब्द म्हटल्याने समजणार नाहीत, ‘आठवण’ म्हटल्याने समजतील. बाबांची खूप आठवण करायची आहे. त्यांना साजन देखील म्हटले जाते. पट्टराणी बनवतात ना. विश्वाच्या राजधानीचा वारसा बाबा देतात. सतयुगामध्ये एक पिता असतो. भक्तीमध्ये दोन पिता असतात आणि ज्ञान मार्गामध्ये आता तुम्हाला तीन पिता आहेत. किती आश्चर्य आहे! तुम्ही अर्था सहित जाणता - सतयुगामध्ये सर्व जण आहेतच सुखी, त्यामुळे पारलौकिक पित्याला जाणतच नाहीत. आता तुम्ही तिन्ही पित्यांना जाणता. या गोष्टी समजण्यासाठी अत्यंत सोप्या आहेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आठवणीमध्ये राहण्यासाठी मुखाने काहीही बोलू नका. मुखामध्ये मोहर घाला, तर क्रोध नाहीसा होईल. कोणावरही क्रोध करायचा नाही.

२) या दुःखधामाला आता आग लागणार आहे, त्यामुळे याला आता विसरून नवीन दुनियेची आठवण करायची आहे. बाबांसोबत पवित्र राहण्याची जी प्रतिज्ञा केली आहे, त्यामध्ये मजबूत होऊन राहायचे आहे.

वरदान:-
निराकारी स्थितीच्या अभ्यासाद्वारे ‘मी’पणा नष्ट करणारे निरहंकारी भव

वर्तमान समयी सर्वात सूक्ष्म आणि सुंदर धागा म्हणजे हा ‘मी’पणा आहे. हा ‘मी’ शब्दच देह-अभिमाना पासून पार घेऊन जाणारा देखील आहे आणि देह-अभिमानामध्ये आणणारा देखील आहे. जेव्हा ‘मी’पणा उलट्या रूपामध्ये येतो, तेव्हा तो बाबांचे प्रिय बनविण्या ऐवजी कोणत्या ना कोणत्या आत्म्याचा अथवा नाम-मान-शानचा प्रिय बनवतो. या बंधनातून मुक्त होण्यासाठी - निरंतर निराकारी स्थितीमध्ये स्थित होऊन साकारमध्ये या. या अभ्यासाला आपला नैसर्गिक स्वभाव बनवा, तेव्हाच निरहंकारी बनाल.

बोधवाक्य:-
एखाद्याची वाईट अथवा चांगली गोष्ट ऐकून संकल्पामध्ये सुद्धा घृणा भाव येणे - हे देखील परमत आहे.

हे अव्यक्त इशारे - अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.

संकल्पामध्ये आणि स्वप्नामध्ये देखील जेव्हा अपवित्रतेचा लवलेश सुद्धा उरत नाही, तेव्हाच म्हटले जाईल - खरा ब्राह्मण; याच धारणेसाठी गायन आहे - ‘प्राण गेला तरी चालेल, परंतु धर्म सोडणार नाही’. अशी हिंमत आणि असा दृढ निश्चय असणारे कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपल्या धर्माप्रति अर्थात धारणेप्रति काहीही त्याग करावा लागला, सहन करावे लागले, सामना करावा लागला किंवा धाडस करावे लागले, तरीही ते आनंदाने करतात, माघार घेत नाहीत.